Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात ‘महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र’ असे बॅनर झळकले आहेत. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह दोन्ही बंधूंचे फोटो आहेत.
महाराष्ट्र, मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे आमच्यातील वाद अतिशय क्षुल्लक असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत देत उद्धव यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले. या हाकेला उद्धव ठाकरे यांनी तात्काळ प्रतिसाद देत महाराष्ट्र हितासाठी किरकोळ भांडणे बाजूला ठेवून एकत्र येण्यासाठी तयारी दर्शवली. त्यानंतर रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघातील पडवळनगर येथे ‘महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र’ अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठाकरे बंधूंचे एकत्रित फोटो आहेत. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर झळकवले आहेत.
‘ही समस्त मराठी माणसाची भावना’
ठाकरे गटाचे शाखाप्रमुख बबन गावडे यांनी हा बॅनर लावला आहे. मी कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून ही बॅनरबाजी केलेली नाही. मी शिवसेनेचे ४५ वर्षे काम करतो. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, ही समस्त मराठी माणसांची भावना असून या भावनेतून हे बॅनर लावल्याची प्रतिक्रिया शाखाप्रमुख गावडे यांनी दिली.
केदार दिघे काय म्हणाले?
ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं झाल्यास त्याचा निर्णय हे दोन्ही बंधू घेतील. राज आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी दोन पावले पुढे टाकलेले असताना अन्य नेत्यांनी भाजपला फायदा होईल अशी भूमिका घेऊन टीकाटिपणी करू नये”, असं आवाहन केदार दिघे यांनी केलं.
मनसेचे अविनाश जाधव काय म्हणाले?
“सर्वांची इच्छा आहे, दोन्ही बंधूंनी एकत्र यावे. उद्धव ठाकरे यांनी हे मनावर घ्यावे. अशक्य असे काही नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र शिवसेना आणि मनसेची विचारधारा एकच असून उद्धव ठाकरे यांनी यासाठी प्रयत्न करावे”, असं मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले.
‘उबाठा – मनसे युती होऊ द्या, मग प्रतिक्रिया देऊ’
“बाळासाहेब हयात असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना स्वीकारले नाही. ते आता राज ठाकरे यांना काय स्वीकारणार. जुने प्रसंग आणि जुन्या गोष्टी कोणी विसरत नाहीत. प्रेम दोन्ही बाजूने पाहिजे, युती एकतर्फी होत नाही. महायुती मजबूत असून तिन्ही पक्ष एकत्र आहेत. उबाठा – मनसे युती होऊ द्या, मग प्रतिक्रिया देऊ”, असं खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
‘हे चांगलंच, त्यात काय वाईट’
“दोन भाऊ एकत्र येत असतील, तर आपण त्यात कशाला निष्कारण बोलावे. हे चांगलंच आहे. त्यात काय वाईट आहे. आमच्या शुभेच्छा आहेत”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

