• Thu. Mar 12th, 2026
    संग्राम थोपटे यांच्या प्रवेशाने मुळशी भाजप नाराज, बावनकुळे यांच्याकडे पत्रातून मांडल्या भावना

    Edited byविमल पाटील | Authored by प्रशांत श्रीमंदिलकर | Lipi | Updated: 20 Apr 2025, 6:56 pm

    Sangram Thopte BJP Joining in Trouble : मुळशी तालुका भारतीय जनता पक्ष (भाजपा) कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे तीव्र नाराजी पसरली आहे.

    Lipi

    प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : मुळशी तालुका भारतीय जनता पक्ष (भाजपा) कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत तालुका भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खरमरीत पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. ‘आयुष्यभर ज्यांचा तिरस्कार केला, ते आता सोबत येणार,’ अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपली खदखद मांडली आहे.

    पत्रात म्हटले आहे की, ‘घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातल्यांना बाहेर झोपावे लागते,’ अशी म्हण उद्धृत करत नवीन प्रवेशांमुळे जुन्या कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. मुळशी तालुक्याने पर्यटन आणि हिंजवडी आयटी पार्कच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत मोठा वाटा उचलला आहे, परंतु स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. ‘आजवर एकही बडा नेता या भागात फिरकला नाही, कोणत्याही कार्यकर्त्यामागे खंबीरपणे उभा राहिला नाही,’ अशी टीका पत्रात आहे.

    कार्यकर्त्यांचा संताप: निवडणुकीनंतर दुर्लक्ष

    पत्रात कार्यकर्त्यांनी पक्षासाठी तन-मन-धन झोकून दिल्याचे नमूद केले आहे. ‘प्रचाराच्या काळात कार्यकर्त्यांना जपले जाते, पण निवडणूक निकालानंतर त्यांचा मरला-जगला हा प्रश्नही नेत्यांना महत्त्वाचा वाटत नाही,’ अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. नेत्यांच्या पायाशी लुडबुड करणारे पुढे जातात, तर हाडाचे कार्यकर्ते दुर्लक्षित राहतात, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

    संग्राम थोपटेंच्या प्रवेशाने अस्वस्थता

    काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने मुळशी तालुका भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘ज्यांच्याविरोधात आयुष्यभर लढलो, त्यांना आता सोबत घेणे आश्चर्यकारक आहे,’ असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रवेशामुळे पक्षातील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे.

    पत्राच्या शेवटी कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. ‘हाडाच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न कोण सोडवणार? पक्ष नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावे,” अशी माफक अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रामुळे मुळशी तालुका भाजपामधील नाराजी आता उघड झाली असून, याचा पक्षाच्या स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *