• Fri. Mar 13th, 2026

    Rajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्याविरोधात न्यायालयीन लढा लढणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा

    Rajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्याविरोधात न्यायालयीन लढा लढणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा

    Rajesaheb Deshmukh on Dhananjay Munde : बीडमधील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप करत, यासाठी आपल्या खात्यात 10 लाख रुपये पाठवण्यात आले, असा दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे खळबळ उडाली असून मुंडेंविरोधात निवडणूक लढलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप रणजित कासले यांनी केला. तसेच आपण धनंजय मुंडे यांचे पैसे पकडले होते, असा दावा कासले यांनी केला. विधानसभा निवडणुकीत आपण कोणतीही कारवाई करु नये, ईव्हीएमसोबत केल्या जाणाऱ्या गोष्टी गप्प राहून बघावे यासाठी आपल्या बँक खात्यात 10 लाख रुपये पाठवण्यात आल्याचा आरोप रणजित कासले यांनी केला आहे. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या कंपनीच्या अकाउंटमधून आपल्या अकाउंटला पैसे पाठवण्यात आल्याचा आरोप कासले यांनी केला. त्यांच्या या आरोपांनंतर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी आपण या प्रकरण हायकोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

    राजेसाहेब देशमुख काय म्हणाले?

    “आम्ही काल पोलीस प्रशासनाचा खरा प्रताप पाहिला. मी राजेसाहेब देशमुख. मी परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार होतो. आम्ही पोलीस अधिकारी रणजित कासले यांचं स्टेटमेंट ऐकलं. त्यांनी सत्य बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. या प्रकरणात विधानसभेची जी निवडणूक झाली, त्यामध्ये पोलीस खात्याने, महसूल खात्याने आणि सर्व प्रशासनाने काय-काय प्रताप केले, धनंजय मुंडेंना कुठल्या पद्धतीने मदत केली, हे रणजित कासले यांनी सांगितलं. त्यामोबदल्यात एकच माणूस बटण दाबणार असेल, त्याला बुथमध्ये कुठलाही त्रास होणार नाही याची पोलीस खात्याने खबरदारी घेतली. मयत लोकांचे मतदान करुन घेतले असतील, महसूल खातं, पोलीस प्रशासन यांचा कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली”, असं राजेसाहेब देशमुख म्हणाले.

    “बुथवर गोंधळ असेल, मारामारी असेल किंवा ईव्हीएम फोडण्याचा प्रताप असेल, संपूर्ण काळजीपूर्वक पोलीस प्रशासन धनंजय मुंडेंबरोबर कसं काम करत होतं हे रणजित कासले यांनी सांगितलं. त्यामुळेच सर्वसामान्य सोबत नसताना देखील चांगल्या मतांनी विजय होऊ शकतो. अशाप्रकारे तर पैकीच्या पैकी मते पडतील ना. कुठलाही प्रचार करायची गरज नाही. काही करायची गरज नाही. पैकीच्या पैकी मतं पडू शकतात ना. ही लोकशाहीमधील किमया आहे”, अशी टीका राजेसाहेब देशमुख यांनी केली.

    “ईव्हीएमला छेडछाड करण्यासाठी एक रणजित कासलेला 10 लाख दिले. मग एसपींना, अॅडीशनला, डीवायएसपींना किती दिले? मग पीआयला, सर्व पोलीस प्रशासनाला, महसूलला किती दिले? ही सर्व यंत्रणा बरबटलेली आहे. लोकशाहीला हाच खरा धोका आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील लोकशाही धोक्यात आलेली आहे. या धोक्यात आलेला लोकशाहीला एकच मार्ग राहिलेला आहे. या प्रकरणात दाद मागितली पाहिजे. म्हणून मी या प्रकरणात हायकोर्टात जाणार आहे”, अशी भूमिका राजेसाहेब देशमुख यांनी मांडली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed