राहुरीतील महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी प्राजक्त तनपुरे यांचे अन्नत्याग उपोषण अंबादास दानवे आणि बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले. आरोपींना लवकर अटक न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दानवे यांनी दिला आहे. थोरात यांनी या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका केली असून, लंके यांनीही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात 26 मार्चला दिवसाढवळ्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. तनपुरे यांची तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावली आणि वजनही कमी झाल्याने उपोषणस्थळी सलाईन सुरू करण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून हे उपोषण स्थगित करण्यात आले.
अंबादास दानवे यांचा मोठा इशारा
“महाराष्ट्राचे पोलीस सक्षम असून एखादा आरोपी शोधणे त्यांच्यासाठी अवघड नाही. मागे एका मंत्र्यांचा मुलगा थायलंडला निघाला होता. मात्र पोलिसांनी, शासनाने ठरवले आणि विमानाचा मार्ग बदलून त्याला परत आणले. मात्र 20 दिवस उलटूनही राहुरी शहरात पुतळा विटंबनेतील आरोपी सापडत नसेल तर त्याचा जाब विचारावाच लागेल. कोरटकर, सोलापूरकर यांची उदाहरणे समोर असल्याने राहुरी प्रकरणात देखील शंका उपस्थित होतेय. 48 तपास घटनेचा तपास झाला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून इथल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. घटनेचा तपास लागला नाही तर हा लढा महाराष्ट्रभर नेऊ”, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
बाळासाहेब थोरातांचा घणाघात
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील पुतळा विटंबन प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. “अलीकडच्या काळात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. सोलापूरकर, कोरटकर शिवाजी महाराजांबद्दल कशा पद्धतीने बोलले हे आपण बघितले. हे सगळं जाणीवपूर्वक चाललं असून लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जाताय. राहुरीत घडलेली घटना याचाच भाग असावी असे वाटते. फोटो बघितल्यानंतर राहुरी शहरातील पुतळा विटंबन कुणी वेड्याने केले असे वाटत नाही तर जाणीवपूर्व केल्याचे दिसते. सरकारला लाज राहिली नाही अशी अवस्था आहे”, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
‘जिल्ह्यातील सर्व रस्ते बंद करू’, लंके यांचा इशारा
अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी देखील सरकारवर निशाणा साधत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे हा महाभयंकर गुन्हा आहे. 20 दिवस उलटूनही आरोपी सापडत नसेल तर ही खेदाची गोष्ट आहे. पोलिसांना आरोपीचा तपास लागत नसेल तर उपोषण करण्यापेक्षा जिल्ह्यातील सर्व रस्ते बंद करू. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या सरकारला आरोपी सापडत नसेल तर ही शरमेची गोष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली.

