• Sun. Mar 8th, 2026
    तनपुरेंचं उपोषण सोडवण्यासाठी मविआचे नेते एकवटले; थोरात, दानवे आणि लंके सरकारवर बरसले

    Prajakt Tanpure Hunger Strike : राहुरी शहरात घडलेल्या महापुरुष पुतळा विटंबना घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी सुरू असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे अन्नत्याग उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित झाले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईने हे स्थगित झाले.

    Lipi

    अहिल्यानगर : राहुरी शहरात घडलेल्या महापुरुष पुतळा विटंबना घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी सुरू असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे अन्नत्याग उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित झाले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईने हे उपोषण स्थगित करण्यात आले असून आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.

    अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात २६ मार्चला दिवसाढवळ्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. घटनेला २० दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी तनपुरे यांची प्रकृती खालावली आणि वजनही कमी झाल्याने उपोषणस्थळी सलाईन सुरू करण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून हे उपोषण स्थगित करण्यात आले.

    विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्राचे पोलीस सक्षम असून एखादा आरोपी शोधणे त्यांच्यासाठी अवघड नाही. मागे एका मंत्र्यांचा मुलगा थायलंडला निघाला होता. मात्र पोलिसांनी, शासनाने ठरवले आणि विमानाचा मार्ग बदलून त्याला परत आणले. मात्र २० दिवस उलटूनही राहुरी शहरात पुतळा विटंबनेतील आरोपी सापडत नसेल तर त्याचा जाब विचारावाच लागेल. कोरटकर, सोलापूरकर यांची उदाहरणे समोर असल्याने राहुरी प्रकरणात देखील शंका उपस्थित होतेय. ४८ तपास घटनेचा तपास झाला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून इथल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. घटनेचा तपास लागला नाही, हा लढा महाराष्ट्रभर नेऊ, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.

    काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील पुतळा विटंबन प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अलीकडच्या काळात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. सोलापूरकर, कोरटकर शिवाजी महाराजांबद्दल कशा पद्धतीने बोलले हे आपण बघितले. हे सगळं जाणीवपूर्वक चाललं असून लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहे. राहुरीत घडलेली घटना याचाच भाग असावी असे वाटते. फोटो बघितल्यानंतर राहुरी शहरातील पुतळा विटंबना कुणी वेड्याने केले असे वाटत नाही तर जाणीवपूर्वक केल्याचे दिसते. सरकारला लाज राहिली नाही अशी अवस्था असल्याची घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे..

    अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी देखील सरकारवर निशाणा साधत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे हा महाभयंकर गुन्हा आहे. २० दिवस उलटूनही आरोपी सापडत नसेल तर ही खेदाची गोष्ट आहे. पोलिसांना आरोपीचा तपास लागत नसेल तर उपोषण करण्यापेक्षा जिल्ह्यातील सर्व रस्ते बंद करू. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या सरकारला आरोपी सापडत नसेल तर ही शरमेची गोष्ट असल्याचे खासदार लंके म्हणाले आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *