• Fri. Mar 20th, 2026

    ठाण्यातील भरवस्तीत हरीण शिरलं, ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलं, अखेर काय झालं?

    ठाण्यातील भरवस्तीत हरीण शिरलं, ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलं, अखेर काय झालं?

    Thane News : घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात असलेल्या हायपर सिटी मॉलनजीक एमबीसी पार्कच्या ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये एक हरीण अडकल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती.

    महाराष्ट्र टाइम्स

    ठाणे : ठाण्यात भरवस्तीत एका ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलेल्या हरणाची वन विभाग व वन्यजीव संस्थेच्या स्वयंसेवकांनी सोमवारी सुखरूप सुटका केली. या हरणाला कोणतीही दुखापत न झाल्याने त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या घटनेमुळे ठाण्यात नागरी वस्तीमध्ये आढळणारे वन्यजीव पुन्हा चर्चेत आले आहेत.

    घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात असलेल्या हायपर सिटी मॉलनजीक एमबीसी पार्कच्या ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये एक हरीण अडकल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती.

    त्यानुसार कक्षासह, वनविभाग आणि वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अडकलेल्या हरणाची सुखरूप सुटका केली. वन विभागाकडून वैद्यकीय तपासणी करून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये मुक्त करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.

    दोन-तीन दिवसांपासून दर्शन

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हे हरीण या परिसरात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या भागात ते दिसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक ओंकार कोळेकर यांनी सांगितले. या मादी हरणाला कोणतीही दुखापत झाली नसून, अन्न अथवा पाण्याच्या शोधात ते याठिकाणी आल्याचा अंदाज कोळेकर यांनी व्यक्त केला.

    ‘तो’ तब्बल सहा दिवस विहिरीत लटकून

    दुसरीकडे, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आकाश नावाचा तरुण सहा दिवसांपासून बेपत्ता होता. गायमुख येथील जंगलातील एका विहिरीत तो पडला होता. येथून जाणाऱ्या भाविकांना त्याने आवाज दिल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ त्याला बाहेर काढले. हा तरुण तब्बल सहा दिवस विहिरीतील झाडाच्या फांदीला लटकून असल्याचे समजल्याने पोलिसही अवाक झाले.

    लहान महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी गायमुख देवस्थान आहे. घरात वडिलांशी भांडण झालेला आकाश बळीराम कायते (२२, रा. पालडोंगरी) हा तरुण ७ एप्रिलपासून घरातून निघून गेला होता. त्याचा शोध सुरू होता. हा तरुण या विहिरीत पडला होता. तो तब्बल सहा दिवस झाडाच्या फांदीला लटकून कसाबसा जीव वाचवून होता.
    Gharkul Yojana : खुशखबर! घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानात ५० हजारांची वाढ, कोणाकोणाला योजनेचा लाभ?
    मध्य प्रदेशातून आलेले भाविक गायमुख येथे दर्शनासाठी चालले होते. ते पार्वती हिवराजवळील बाहुली विहिरीकडे जात असताना विहिरीतून ‘वाचवा! वाचवा!’ असा आवाज ऐकू आला. सुरुवातीला त्यांना आवाज कुठून येत आहे हे कळलेच नाही. त्यानंतर भाविकांची तारांबळ उडाली. त्यांनी तात्काळ पोलिस पथकाला माहिती दिली. त्यावेळी परिसरात गस्तीवर असलेले ठाणे प्रभारी सुनील राऊत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
    Mumbai Metro : मेट्रोची पिवळी मार्गिका मुंबईकरांसाठी सज्ज, सहा डब्यांची अत्याधुनिक गाडी, कुठून कुठे जाणार?
    राऊत यांनी विहिरीत डोकावून पहिले असता आकाश झाडाची फांदी धरून विहिरीत लटकत होता. अर्धा पाण्यात बुडालेला आकाश मोठ्या हिमतीने झाडाच्या फांद्यांना धरून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होता. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून आकाशला सुखरूप बाहेर काढले. यानंतर त्याला तुमसर येथील सुभाषचंद्र बोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed