• Mon. Jun 15th, 2026
    मुंबईत १० वर्षांमधील सर्वाधिक तापमान, पुण्यातही पावसाचं आगमन लांबणीवरच; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवस गोवा आणि तळकोकण येथे पाऊस पडल्यानंतर कोकण किनारपट्टीवरून पाऊस गायब झाला आहे. सध्या वारेही वायव्येकडून असून, यामुळे तापमानाचा ताप अधिकच जाणवत आहे. मुंबईमध्ये गुरुवारी कुलाबा येथे ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या १० वर्षांमधील हे जूनमधील सर्वाधिक कमाल तापमान आहे.

    दोन दिवस उष्ण वातावरण

    सन २०२३ ला जून महिन्यात ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. यासोबतच जूनमधील किमान तापमानानेही यंदा विक्रम केला असून सातत्याने पाच दिवस कुलाबा येथे ३० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले जात आहे. गुरुवारी कुलाबा येथे सरासरीपेक्षा ३.५ अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. सांताक्रूझ येथे कुलाब्यापेक्षा कमी कमाल तापमान होते. सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा २.३ अंशांनी अधिक होते. वायव्येकडून येणारे वारे, आकाशात पावसाळी ढग नसणे यामुळे कोकण विभागात चढे तापमान होते. गुरुवारी अलिबाग येथे ३६.६ तर हर्णे येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. या केंद्रांवरील तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी अधिक होते. कमाल तापमानासोबत किमान तापमानाचाही पारा चढा आहे. मुंबईत कुलाबा येथे गेल्या पाच दिवसांपासून ३० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद होत आहे. सातत्याने पाच दिवस किमान तापमानाचा पाराही चढा असल्याने मुंबईकरांची रात्रीची झोपही हरवली आहे. २४ तासांमध्ये तापमानाचा पारा ३० अंशाखाली जात नसल्याने वातावरणात उष्णता साचून राहिल्याची सातत्याने जाणीव होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवार १२ आणि शनिवार १३ जूनसाठी उष्ण आणि दमट वातावरणाचा महामुंबईला इशारा दिला आहे.

    पुण्यात पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. पोषक वातावरणामुळे मान्सून प्रवास मंदावला आहे. पुढील तीन ते चार दिवस पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती ‘आयएमडी’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.

    पुण्यात आगमन लांबले

    पुण्यामध्ये सर्वसाधारणपणे दर वर्षी १० जूनच्या सुमारास दाखल होणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन यंदा रखडले आहे. प्रतिकूल घडामोडींमुळे महाराष्ट्रात मान्सूनची पुढील वाटचाल थंडावली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे.

    मान्सूनने सहा जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र, त्याची प्रगती थांबली आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या हवामान विभागाच्या बुलेटिननुसार, नैर्ऋत्य मोसमी वारे कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, बिहारच्या काही भागापर्यंत; तसेच उत्तर सीमेला हर्णै, सोलापूर, हैदराबादमध्ये सरकला. विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत झालेला पाऊस पूर्वमोसमी आहे.

    पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख १० जून आहे. एक किंवा दोन दिवस मागे-पुढे होणे सामान्य मानले जाते. मात्र, पुढील दोन दिवस मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण नसल्याने पुण्यात मान्सूनचे आगमन लांबले असल्याचे म्हणता येईल. सुरुवातीच्या टप्प्यात काही काळ प्रवास थांबणे सामान्य असून, याचा अर्थ संपूर्ण हंगाम लांबणार असा नाही, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

    विदर्भात पूर्वमान्सूनचा धुमाकूळ

    भारतीय हवामान विभागाने विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. सध्या विदर्भात वादळी वाऱ्यांसह पूर्वमान्सूनच्या जोरदार सरी बरसत आहेत. येत्या चार-पाच दिवसांत ढगाळ वातावरण कायम राहून उष्मा वाढण्याची शक्यता आहे.

    खानदेशमध्ये मान्सून लांबणीवर

    दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलं आहे. उन्हाच्या झळा कायम राहणार असून मान्सूनसाठी 15 जूनची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

    Maharashtra TimesWeather Update: महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती सुरू, पण मुंबई-पुण्यात आणखी काही दिवस प्रतीक्षा; कोण-कोणत्या भागांत पावसाचा अंदाज?

    कोकणातून मान्सून मंदावला

    कोकणात काही दिवसांपूर्वीच मान्सून धडकला असला तरी पुढील वाटचाल मंदावली आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात मुसळधार पाऊस बरसतो पण यंदा कोकणात हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळतो आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed