• Sat. Mar 14th, 2026
    सीमाने लताची मनापासून सेवा केली, तिला ५० हजार ठेवलेत; जोशींची रडवणारी शेवटची चिठ्ठी

    नाशिकमध्ये मुरलीधर जोशी नावाच्या एका निवृत्त प्राध्यापकाने पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी स्वतःही गळफास घेतला. जोशी दाम्पत्य जेलरोड भागात राहत होते. पत्नी आजारी असल्याने जोशींनी हे कृत्य केले. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली. त्यात पत्नीवरील प्रेम आणि आजारामुळे दोघांनाही मुक्त करत असल्याचे नमूद केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नाशिक : नाशिकमधील जेलरोड भागात राहणारे निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी (वय 80) यांनी आधी पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. जोशींनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नीवरील प्रेम व्यक्त केलं होतं. त्याचप्रमाणे आणखी एका व्यक्तीचं नाव या चिठ्ठीत होतं.

    “मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, तिला आजारपणातून मुक्त करत आहे आणि तिच्यासोबत स्वतःही मुक्त होत आहे” अशी सुसाईड नोट जोशींनी लिहिली होती. पत्नीच्या दीर्घ आजारामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

    मुरलीधर जोशी आणि त्यांची पत्नी लता जोशी जेलरोडच्या एकदंत अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र ते दोघेही नाशिकबाहेर वेगवेगळ्या शहरात राहतात. लता जोशी आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होत्या. त्यांची काळजी घेण्यासाठी सीमा राठोड नावाच्या महिलेला कामावर ठेवले होते.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास केअर टेकर सीमा राठोड काम संपवून निघून गेल्या. त्यानंतर मुरलीधर जोशी यांनी पत्नी लता यांचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी स्वतः देखील गळफास घेतला. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सीमा राठोड परत आल्या. त्यांनी दरवाजा उघडला, तेव्हा त्यांना वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत आढळले.

    वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी भेट दिली, पंचनामा केला. जोशींनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी पत्नीवर प्रेम असल्याचे म्हटले आहे. पत्नीच्या गळ्यावर व्रण असल्याने तिचा गळा दाबून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
    Sindhudurg News : माकडाची चूक युवकाला भोवली, रानात फांदीला धक्का लागला अन्… कोकणातील कुटुंबाचा आधार हरपला
    आत्महत्येपूर्वी मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठीत लिहिले: “माझं लतावर खूप प्रेम आहे. ती अंथरुणाला खिळून असून आजाराला वैतागलेली आहे. तिला या आजारातून मुक्त करण्यासाठी तिच्यासोबत मीही मुक्त होत आहे. घरकाम करणाऱ्या सीमाने लताची खूप सेवा केली. तिच्यासाठी ५० हजार रुपये बाजूला काढून ठेवले आहेत. ते तिला देण्यात यावे.” असं लिहिणाऱ्या जोशींनी दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसेही ठेवले होते.

    “अंत्यसंस्कारासाठी कोणीही खर्च करू नये. लतावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी, मंगळसूत्र, जोडवी असे सर्व अलंकार घालून अंत्यसंस्कार करा” असंही त्यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मुरलीधर जोशी आणि त्यांची पत्नी दोघेही निवृत्त झाले होते. मुरलीधर जोशी हे दुर्गा देवी ज्येष्ठ नागरिक संघात सक्रिय होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मंदिरासाठी देणगीची पावतीही फाडली होती.
    Buldhana News : स्विमिंग पूलमध्ये पोहताना अनर्थ, BAMS च्या दोघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, मित्रांदेखतच प्राण सोडले
    लता जोशी गेल्या साडेतीन वर्षांपासून आजारी होत्या. त्या अंथरुणाला खिळून होत्या. मुरलीधर जोशी त्यांची सेवा करत होते. घराची कामे करण्यासाठी त्यांनी सीमा राठोड यांना कामावर ठेवले होते. बुधवारी दुपारी काम करत असताना मुरलीधर यांनी सीमाला एक हजार रुपये दिले. तिला काही वस्तू आणण्यास सांगितल्या होत्या. तसंच स्वतःची कामं करून संध्याकाळी परत येण्यास सांगितलं होतं.

    या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. जोशी दाम्पत्याने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed