• Mon. Mar 9th, 2026
    शेतकऱ्याला धमकावलं, कर्जवसुलीच्या नावावर थेट लाचखोरी, २०० रुपये घेऊन बँक वसुली पथक कर्मचारी माघारी!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Apr 2025, 10:03 pm

    बैलजोडी जप्तीची धमकी देत शेतकऱ्याकडून २०० रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील ही घटना असून, या संदर्भातील व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. कर्जदार शेतकरी आपल्या बैलजोडीला टेम्पोमधून नेत असताना, अचानक बँकेच्या वसुली पथकाची गाडी समोर आली. गाडीतून उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी बैलजोडी जप्त करण्याची धमकी देत शेतकऱ्याकडून २०० रुपये घेतल्याचं स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये दिसतं. वसुली पथकाच्या वाहनावर ‘ब्रम्हपुरी अर्बन बँक’ असा फलक लावलेला दिसतो. विशेष म्हणजे, शेतकऱ्याने २०० रुपयांची नोट हातात दिल्यानंतर कर्मचारी तिथून माघारी गेले. या घटनेने पुन्हा एकदा कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांवर होणारा अन्याय समोर आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत काँग्रेस नेते व ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पोलिस अधीक्षकांशी बोलून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. शेतकरी दरवर्षी शेतीच्या हंगामासाठी खासगी बँकांकडून कर्ज घेतात आणि वेळेत परतफेडही करतात. मात्र, अशा घटनांमुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. शेती हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर जर शेतकऱ्यांवर असा ताण आणि अपमान होणार असेल, तर आत्महत्येशिवाय पर्यायच काय उरतो? अशाच जाचातून सुटका करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी आजवर गळ्याभोवती फास आवळला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या कितीही गप्पा मारोत, पण ही यंत्रणा किती निष्ठूर आणि असंवेदनशील आहे, हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झालं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed