• Fri. Mar 13th, 2026

    KDMC च्या प्रसूतीगृहात गर्भवतीचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप

    KDMC च्या प्रसूतीगृहात गर्भवतीचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप

    Kalyan Pregnant Women Death- कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रसुतीगृहात उपचारा दरम्यान एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.

    Lipi

    प्रदीप भणगे, कल्याण: दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रकरण ऐरणीवर असतानाच कल्याण (Kalyan) शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात शांतीदेवी अखिलेश मौर्य (वय ३०) या महिलेचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. तिची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावली. तिला इंजेक्शन दिले गेले. तिला प्रसूतीगृहातून खाजगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

    धक्कादायक म्हणजे प्रसूती गृह असलेल्या या रुग्णालयात आयसीयु नसल्याचे देखील माहिती समोर आली आहे.केडीएमसीच्या डॉक्टरांनी आम्ही कोणताही हलगर्जीपणा केला नाही, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सांगितले.

    पतीची प्रतिक्रया
    माझ्या पत्नी शांती देवी मोर्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी इथे आलो होतो.मला सकाळपासून येथे येऊ दिले नाही. आणि अचानक तीन वाजता शस्त्रक्रिया सुरू केली. मात्र ती शस्त्रक्रिया झालीच नाही. इंजेक्शनमुळे पत्नीचा मृत्यू झाला. मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी इतकीच मागणी मी करू शकतो.

    सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू
    दरम्यान दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या डाेंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोन डॉक्टरांना महापालिकेने सेवेतून कमी करीत त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.डोंबिवली पश्चिमेकडील मोठगाव येथील रहिवासी सुवर्णा सरोदे यांचे सिझेरियन ऑपरेशन झाले, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. नंतर जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या संमतीशिवाय ऑपरेशन दरम्यान तिचे गर्भाशय काढून टाकण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक पातळीवर रुग्णालय आणि तेथील डॉक्टरांच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच हे दुसरी घटना घडली आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed