• Sat. Mar 7th, 2026
    Maharashtra Weather : राज्यभरात पावसाच्या तुरळक सरी, IMD अलर्टच्या पार्श्वभूमीवर वरुणराजाची हजेरी; पुढील ४८ तास महत्वाचे

    Maharashtra Weather Update : छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मंगळवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुढील ४८ तास पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मंगळवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुढील ४८ तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घसरण झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार आज सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे.

    मराठवाड्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, पैठण तालुक्यात मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हापासून सुटका झाली असली तरी वातावरणात दमटपणा वाढला आहे. पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवली आहे.

    उत्तरेतील थंड वारे महाराष्ट्रात पोहचत आहेत. हिंद महासागरावर बाष्प तयार झाल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. पुढील ४८ तास मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असे औंधकर यांनी सांगितले. दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असणार आहे. सध्या समुद्रसपाटीपासून महाराष्ट्र ते ओडिसापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतितास ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

    शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. गंगापूर तालुक्यातील भेंडाळा, बाबरगाव, भोयगाव, बोलेगाव, लिंबे जळगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. पैठण तालुक्याही पावसाचा जोर कायम होता. शहरात मंगळवारी किमान २५ आणि कमाल ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तापमान काही प्रमाणात कमी झाले आहे.

    पावसात वीज गायब

    छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. चिकलठाणा, हर्सूल, जळगाव रोड, भावसिंगपुरा, विद्यापीठ परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे चिकलठाणा, आंबेडकरनगर परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. तासभर वीज नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. क्रांती चौकासह मध्यवर्ती शहरात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed