• Sun. Mar 8th, 2026

    सीएमच्या ताफ्यासाठी अलका चौकात रुग्णवाहिका अडवली, शरद पवारांच्या नेत्याकडून व्हिडिओ शेअर

    सीएमच्या ताफ्यासाठी अलका चौकात रुग्णवाहिका अडवली, शरद पवारांच्या नेत्याकडून व्हिडिओ शेअर

    Pune Ambulance stopped for CM Convoy : पहिला व्हिडिओ अलका चौकातील असून त्यामध्ये अॅम्ब्युलन्स ट्राफिकमध्ये अडकलेली दिसते, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये विद्यापीठ चौकात मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते.

    Lipi

    आदित्य भवार, पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा काल पुणे दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी शहरातील विविध कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडथळा होऊ नये म्हणून पोलिसांनी अॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP SP) गटाच्या नेत्यांनी केला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या संदर्भातील दोन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिला व्हिडिओ अलका चौकातील असून त्यामध्ये अॅम्ब्युलन्स ट्राफिकमध्ये अडकलेली दिसते, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये विद्यापीठ चौकात मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते.

    प्रशांत जगताप यांनी काय म्हटले?

    “२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि देशातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले. ‘व्हीआयपी संस्कृती बंद करतो’ अशी मोठी घोषणा त्यांनी केली होती. २०१६ मध्ये लाल दिव्याच्या गाड्या बंद केल्या, मात्र प्रत्यक्षात व्हीआयपी कल्चर अजूनही संपलेले नाही.” असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

    “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली. आमचा व्हीआयपी कल्चरला विरोध नाही, पण यामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, एवढीच अपेक्षा आहे,” असे जगताप यांनी म्हटले.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वाहतूक कोंडीसाठी प्रशासन आणि सरकारला जबाबदार धरले आहे. आता राज्य सरकार यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे लक्ष लागले आहे.

    दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पुणे दौऱ्यावर होते. २०२१-२२ वगळता दरवर्षी देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होतेय. यंदाच्या तिमाही अहवालातही औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर असून देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटचाल करत आहे, तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२९ मध्ये एक ट्रिलियनवर नेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed