• Tue. Mar 10th, 2026

    Palghar News: अशांत किनाऱ्यांमुळे कासवांनी बदलली दिशा; डहाणूत १८ वर्षांत अंडी घालण्यासाठी मादी फिरकलीच नाही

    Palghar News: अशांत किनाऱ्यांमुळे कासवांनी बदलली दिशा; डहाणूत १८ वर्षांत अंडी घालण्यासाठी मादी फिरकलीच नाही

    Palghar News: मागील १८ वर्षांत कासवाच्या एकाही मादीने येथील किनाऱ्यावर अंडी घातल्याची नोंद वन विभाग किंवा कासवांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेकडे नाही.

    महाराष्ट्र टाइम्स
    palghar news

    अनिरुद्ध पाटील, डहाणू : पालघर जिल्ह्याचा समुद्रकिनारा हा सागरी कासवांसाठी नंदनवन समजला जात असे. मात्र मागील १८ वर्षांत कासवाच्या एकाही मादीने येथील किनाऱ्यावर अंडी घातल्याची नोंद वन विभाग किंवा कासवांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेकडे नाही. येथील समुद्रकिनाऱ्यांवरील शांततेचा भंग झाल्याने ही परिस्थिती आल्याचे कासवमित्रांचे म्हणणे आहे.

    दोन दशकांपूर्वी पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी सागरी कासवांनी अंडी घातल्याचे अनेकांनी पाहिले आहे. सन २००४मध्ये डहाणू तालुक्यातील चिखले गावातील खाडीपाडा येथील पवनचक्की नजीकच्या किनाऱ्यावर कासवाने अंडी घातल्याचे सचिन मांगेला या स्थानिकाच्या निदर्शनास आले. त्या अंड्यांचे मानव, कुत्री आणि अन्य प्राण्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी त्यांनी घराच्या अंगणात खड्डे खोदून त्यात ही अंडी ठेवली. दोन महिन्यांनी पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना समुद्रात सोडण्यात आले. या कार्यात त्यांना दिवंगत मानद वन्य जीवरक्षक धवल कंसारा आणि निसर्गमित्र सूर्यहास चौधरी या स्थानिकांची मदत झाली होती.

    सन २००८ पर्यंत ती मादी कासव अंडी घालण्यासाठी किनारा गाठत असे. मांगेला त्या अंड्यांचे संरक्षण करून पिल्ले बाहेर पडल्यावर समुद्रात सोडण्याची मोहीम पार पाडत असत. या उपक्रमातून त्यांनी सुमारे १०० पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडले, परंतु नंतर मादी अंडी घालण्यासाठी फिरकलीच नाही, असे सचिन सांगतात. जिल्ह्याच्या अन्य किनाऱ्यांवरही कासवाने अंडी घातल्याची नोंद वन विभाग, तसेच कासवांसाठी कार्य करणाऱ्या ‘वाइल्ड लाइफ कन्झरव्हेशन अॅण्ड अनिमल वेल्फेअर असोसिएशन’ च्या सदस्यांकडेही नाही.

    मादी कासव अंडी घालण्यासाठी एकच किनारा गाठते. या जिल्ह्यातील समुद्रकिनारी गावांमध्ये ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी, लॉन्गरहेड, लेदर बँक आणि हॉक्सबील या जातींची कासवे आढळतात, असे स्थानिक कासवमित्र सांगतात. पूर्वी येथील किनाऱ्यांवर कासवांनी अंडी घातल्याचे आणि अंड्यातून निघालेली पिल्ले समुद्रात जाताना अनेकांनी पाहिली होती. याशिवाय सुमारे १०० पिल्ले समुद्रात सोडल्याचे पुरावे, प्रत्यक्षदर्शी आणि छायाचित्रांच्या माध्यमातूनही उपलब्ध आहेत. यामुळेच देशातील पहिले सागरी कासवांचे शुश्रुषा केंद्र डहाणूतील उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारात उभे राहिले.

    आज या शुश्रुषा केंद्रात सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर आणि गुजरात राज्यातील किनाऱ्यावरील जखमी कासवे आणून उपचार केले जातात. मुंबईतील किनाऱ्यावरही अंडी घालण्यासाठी आलेली मादी कासव पूरक वातावरण किनाऱ्यावर न मिळाल्याने माघारी फिरल्याचे समोर आले. या घटनेनंतर पालघर जिल्ह्यात चर्चेला सुरुवात झाली आहे. गतवैभव प्राप्त होण्यासाठी शांत किनाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी वाळूची पठारे, त्यावर मर्यादावेल, केतकी, केवडा, दुर्वा, तसेच अन्य झाडेझुडुपे, वेली आदींची वाढ झाली पाहिजे. त्यासाठी अवैध रेतीउपसा, किनाऱ्यांवर भराव, सीआरझेडचे उल्लंघन होऊन उभी राहिलेली बांधकामे, पर्यटनाचा अतिरेक थांबवण्याकरिता उपाययोजना अंमलात यायला हव्यात, असे मानद वन्य जीवरक्षक हार्दिक सोनी यांनी सांगितले.

    उपाययोजना आवश्यक
    सागरी कासवांवर उपचार करण्यासाठी देशातील पहिले शुश्रुषा केंद्र डहाणूतील पारनाका येथे सुरू करण्यात आले. मुंबई ते गुजरात किनाऱ्यावरील जखमी कासवांवर येथे उपचार केले जातात. येथे उपचारांसाठी येणाऱ्या कासवांची संख्या दरवर्षी वाढत आहे. म्हणूनच पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यास कासवांनी अंडी घालण्यासाठी पसंती द्यावी, यासाठी उपायांची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed