• Sat. Apr 12th, 2025 10:15:57 PM
    ३० वर्षीय तरुणाने Mumbai च्या कोस्टल रोडवरुन उडी घेत जीवन संपवलं

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Mar 2025, 11:20 am

    Mumbai News : दर्शित राजूभाई सेठ एक पदवीधर होता. आणि चार महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक कोळी रहिवाशांनी मृतदेह पुलाखाली तरंगताना पाहिला आणि त्याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाने दर्शितचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवरून एका ३० वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव दर्शित सेठ असून तो मुंबईच्या मालाड भागातील रहिवासी आहे. दरम्यान, दर्शितच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी कोस्टल रोडवरील वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणाऱ्या बो स्ट्रिंग आर्च ब्रिजवर ही घटना घडली. मुंबई मालाड येथे वास्तव्यास असलेला ३० वर्षीय दर्शित राजूभाई शेठ वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. मंगळवारी कामावरुन सुटल्यानंतर त्याने त्याची गाडी वांद्रे-वरळी सी लिंकच्या दिशेने नेत आर्च ब्रिजजवळ पार्क केली. एका ट्रॅफिक अधिकाऱ्याने त्याची पार्किंग लाईट चालू असलेली गाडी पाहिली आणि ते अधिकारी त्याच्याकडे विचारणा करण्यासाठी जाणार त्यापूर्वीच, दर्शितने समुद्रात उडी मारली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

    अधिकाऱ्याने पुलाच्या जवळ तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती देऊन सतर्क केले. घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. संध्याकाळपासून रात्र होईपर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली. परंतु अंधार पडल्याने आणि प्रकाशाचा अभाव असल्याने मृतदेह सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक कोळी रहिवाशांनी मृतदेह पुलाखाली तरंगताना पाहिला आणि त्याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाने दर्शितचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवला.

    मृतदेह मिळाल्यानंतर त्याच्या मोबाईल फोनद्वारे पोलिसांनी दर्शितच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. दर्शित राजूभाई सेठ एक पदवीधर होता. आणि चार महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, गेल्याच वर्षी रस्त्याचे उद्घाटन झाल्यानंतर पुलावर आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed