• Wed. Mar 11th, 2026
    नागपूर हिंसाचारानंतर जयंत पाटलांचा फडणवीसांना थेट प्रश्न, मुख्यमंत्र्यांचा नितेश राणेंना संयमाचा सल्ला

    Devendra Fadnavis Advice to Nitesh Rane : लोकमत समुहाकडून आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली आहे. यावेळी जयंत पाटलांनी फडणवीसांना अनेक गोष्टींवर बोलते केले आहे. जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी नितेश राणेंना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : लोकमत समुहाकडून आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली आहे. यावेळी जयंत पाटलांनी फडणवीसांना अनेक गोष्टींवर बोलते केले आहे. सध्या नागपुरातील हिंसाचार घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच विरोधकांकडून नितेश राणे थेट निशाणा साधला जात आहे. राणेंच्या बेताल वक्तव्यामुळेच वाद उफाळला असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नितेश राणेंना ताकीद दिली असल्याचे वृत्त समोर आले. आता फडणवीसांनी जयंत पाटलांसोबतच्या या मुलाखतीत नितेश राणेंना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी फडणवीसांनी भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा दाखला दिला आहे.

    मुलाखतीत आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नितेश राणेंबाबत प्रश्न विचारला. ‘तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे’ असा सल्ला फडणीवीसांनी राणेंना दिला. फडणवीस म्हणाले, ‘मला वाटतं, आपण मंत्री असतो तेव्हा आपण संयमानेच बोललं पाहिजे. मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे, ज्याचा उल्लेख आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी केला होता. मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो. यावेळी आपले विचार काय? आपली आवड-नावड काय? हे सर्व बाजूला ठेवून आपण संविधानाची घेतलेली आहे. संविधानाने आपल्यावर कोणासोबतही अन्याय न करता वागण्याची जबाबदारी दिली आहे. ती विसरता कामा नये’

    देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना उत्तर देताना अप्रत्यक्षपणे नितेश राणेंचे कान टोचले आहेत. ‘मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. कधी-कधी तरुण मंत्री बोलून जातात. त्यांच्याशी मी संवाद करतो, त्यांना मी सांगतो. की आता तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे.’ असे म्हणत संयमाची भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed