• Sat. Mar 7th, 2026
    कबरीचा उदो उदो नको! औरंगजेबवादाबाबत मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा, तणावाबाबत शांततेचे आवाहन

    Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb: जाती-धर्मामध्ये दुभंगलेला महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षित नाही. आज एक संदेश निश्चितपणे जात आहे की, देशामध्ये उदात्तीकरण होईल, तर ते शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे. औरंगजेबाच्या कबरीचे नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

    हायलाइट्स:

    • कबरीचे संरक्षण हे दुर्दैव; फडणवीस यांची खंत
    • भिवंडीतील मंदिरातून प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास
    • हे खऱ्या अर्थाने राष्ट्रमंदिर असल्याचे प्रतिपादन
    महाराष्ट्र टाइम्स
    maharashta CM

    मुंबई : ‘महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसा प्रयत्न कोणी केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला.‘खरेतर औरंगजेबाची कबर हवी कशाला, मात्र, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने त्याला ५० वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारवर आहे. हजारो लोकांना मारणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करावे लागते, हे दुर्दैव आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

    शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाड्यात उभारण्यात आले आहे. या मंदिराचे सोमवारी, तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीच्या दिनी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
    मुंबईत म्हाडाचं घर हवंय? पण अशी चूक नकोच, १२ जणांची दोन कोटींची फसवणूक, काय घडलं?
    ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे या ठिकाणी अतिशय सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे. आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन साधना करू शकतो, यासाठी हे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या परिसरात शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग आपणास पाहण्यास मिळतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे ‘राष्ट्रमंदिर’ आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या मंदिराच्या माध्यमातून एक मोठी प्रेरणा सगळ्यांना मिळत राहील,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनीव्यक्त केला.

    ‘ज्या काळामध्ये देशातील अनेक राजे मुघलांची आणि परकीय आक्रमकांची मनसबदारी घेऊन त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते. कोणाचेतरी मनसबदार, सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा देशात तयार झाली होती. त्यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुलखाला पारतंत्र्यात राहू देणार नाही. परकीय आक्रमकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे. रयतेचे राज्य स्थापन झाले पाहिजे, अशा प्रकारच्या विचारांतून राजमाता जिजाऊ यांनी शिवबांना घडवले,’ असे फडणवीस म्हणाले. ‘ज्यांनी कधी लढण्याचा विचार केला नाही, अशा अठरा पगड जातीच्या लोकांना शिवाजी महाराजांनी एकत्र केले. देव, देश, धर्मासाठी मावळे लढले. त्यातून पुढच्या काळात मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकावला. एकोप्याने, सोबत आणि एकसंध राहणारा महाराष्ट्र हाच खऱ्या अर्थाने शिवरायांना अपेक्षित महाराष्ट्र आहे. जाती-धर्मामध्ये दुभंगलेला महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षित नाही. आज एक संदेश निश्चितपणे जात आहे की, देशामध्ये उदात्तीकरण होईल, तर ते शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे. औरंगजेबाच्या कबरीचे नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
    मुलांच्या शिक्षणासाठी दाम्पत्याचं मोठं पाऊल; फी भरण्यासाठी पैसे नसल्याने केली चोरी, नाशिकमधील प्रकार
    या मंदिराला धार्मिक स्थळाचा दर्जा देऊन या ठिकाणी सुविधा देण्याची मागणी कपिल पाटील, सुरेश म्हात्रे यांनी केली. भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याची समस्या दूर करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली. ‘मंदिराला तीर्थस्थळाचा आणि पर्यटनाचा दर्जा दिला, तर या भागाच्या विकासाला दिशा मिळेल. यात्री निवास उभारावे,’ अशी मागणी कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

    या कार्यक्रमास भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, महेश चौघुले, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, बालयोगी सदानंद महाराज, गोविंदगिरी महाराज, शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, विश्वस्त डॉ. राजू चौधरी उपस्थित होते.
    नाशिक विभागात वर्षभरात ३१६ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक घटना, काय सांगते आकडेवारी?
    १२ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळासाठी प्रयत्न
    ‘राज्य आणि केंद्र सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोकडून मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. पानीपत येथेही भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    तीर्थस्थळाचा दर्जा
    ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिर (शक्तिपीठ) परिसराला तत्काळ तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात येईल. येथील विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी केल्या जातील. या ठिकाणी रस्त्यांचे जाळे तयार करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात येईल. जेणेकरून मंदिरात येणे सोयीचे होईल. भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या संदर्भातील अडचणी दूर करण्यात येतील,’ अशी आश्वासने मुख्यमंत्र्यांनी दिली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed