• Sun. Jun 14th, 2026

    Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला, गौतम अदानींकडून कामाचा आढावा

    Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला, गौतम अदानींकडून कामाचा आढावा

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जून २०२५मध्ये सुरू होणार आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी प्रकल्प स्थळाची पाहणी केली आणि प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. या नवीन विमानतळामुळे नवी मुंबई आणि मुंबई शहराच्या वाढत्या प्रवासी गरजा पूर्ण होणार आहेत. अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळ आधुनिक प्रवासी आणि मालवाहतूक सुविधा देणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळ एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असे संकेत यापूर्वी मिळालेले असतानाच या विमानतळासाठी आता जूनचा मुहूर्त मिळाल्याचे दिसत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पस्थळी भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला व प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. जून २०२५मध्ये नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन प्रस्तावित असल्याचे अदानी समूहातर्फे यानंतर सांगण्यात आले.

    ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाला गती देणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. २०२५च्या जूनपर्यंत तो पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही त्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. जून २०२५मध्ये त्याचे उद्घाटन होईल. हा विमानतळ नवी मुंबई व मुंबई शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल,’ असा विश्वासही अदानी यांनी या पाहणीदरम्यान व्यक्त केला. यावेळी अदानी यांच्यासोबत डॉ. प्रिती अदानी, जीत अदानी, दिवा अदानी, तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल आणि एनएमआयएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन बीव्हीजेके शर्मा व विविध संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    विमानतळाची प्रमुख वैशिष्ट्ये

    ■ अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळ
    ■ वेगवान संपर्कासाठी मोठे रस्ते आणि मेट्रो प्रकल्पांशी जोडणी
    ■ उच्च दर्जाच्या आधुनिक प्रवासी आणि मालवाहतूक सुविधा
    ■ पर्यावरणपूरक आणि शाश्वत पायाभूत सुविधा

    नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. हा विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची संपर्कयंत्रणा आणि व्यापारवाढीच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. नवी मुंबई विमानतळ अदानी समूहाद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने विकसित केले जात आहे. या विमानतळामुळे मुंबईवरील प्रवासी आणि मालवाहतुकीवरील ताण कमी होईल.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed