• Tue. Sep 8th, 2026
एका उद्योजिकेची यशोगाथा

women success story : मोचीचा हा व्यवसाय पुरुष करत असतात. सुरुवातीला अनेक जण सुशीलाबाईच्या या कामावर हसत होते. नातेवाईक आणि समाजातील लोक लाजत देखील होते. मात्र, या सर्व बाबींवर त्यांनी दुर्लक्ष केले. आज मी काम नाही केले, तर माझी मूलं उपाशी राहतील असा विचार त्यांच्या मनात येत होता. त्यामुळे त्यांनी कुठलाच संकोच मनामध्ये बाळगला नाही.

Lipi

अर्जुन राठोड, नांदेड : घरात अठरा विश्व दारिद्र्य, त्यात पतीने अर्ध्यावरती साथ सोडली. पदरात दोन मुले. नातेवाईकांनीही पाठ फिरवली. अशा बिकट परिस्थितीत खचून न जाता आणि कोणतीही लाज न बाळगता एका महिलेने पतीचा चप्पल शिवण्याचा व्यवसाय पुढे नेत मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न व स्वतः चे हक्काचे घर उभे करून संसार सावरला. ही संघर्षगाथा आहे नांदेड शहरातील ५७ वर्षीय सुशीलाबाई नागोराव हराळे यांची. फूटपाथावरील तीन बाय तीन या जागेवर दिवसभर चप्पल बूट शिवण्याचं काम करून सुशीलाबाईने उदरनिर्वाहच साधन देखील मिळवलं आहे. त्यांचा हा जीवन प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

सुशीलाबाई हराळे ह्या मूळ कंधार तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांचे पती नागोराव हराळे हे चप्पल बूट (मोची ) शिवण्याचे काम करत होते. तर त्यांच्या पत्नी सुशीलाबाई ह्या संसाराला हातभार लावण्यासाठी लोकांच्या घरी धूणंभांडं काम करायच्या. १५ वर्षापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या पदरात एक मुलगा आणि एक मुलगी होती. काही दिवसानंतर त्यांनी आपल्या पतीचा व्यवसाय पुढे चालू ठेवत बूट चप्पल शिवण्याचं काम हाती घेतले. चैतन्यनगर येथील शिवमंदिर जवळील फूटपाथावर तीन बाय तीन या जागेवर त्यांचा हा व्यवसाय अविरतपणे सुरु आहे. विशेष म्हणजे मोचीचा हा व्यवसाय पुरुष करत असतात. सुरुवातीला अनेक जण सुशीलाबाईच्या या कामावर हसत होते. नातेवाईक आणि समाजातील लोक लाजत देखील होते. मात्र, या सर्व बाबींवर त्यांनी दुर्लक्ष केले. आज मी काम नाही केले, तर माझी मूलं उपाशी राहतील असा विचार त्यांच्या मनात येत होता. त्यामुळे त्यांनी कुठलाच संकोच मनामध्ये बाळगला नाही. ऊन, पाऊस आणि थंडीतही त्या काम करायच्या. याच व्यवसायातून त्यांनी दोन्ही मुलांना शिकवले आणि त्यांचे लग्न देखील लावले. सुशीलाबाईने पुरुषाची मक्तेदारी मोडून काढत स्वतः या व्यवसायात उतरून एक आदर्श निर्माण केला आहे.

सुशीलाबाई ह्या दिवसात ८ तास काम करतात. त्यातून त्यांना दिवसाआड तीनशे रुपये तर महिन्याला नऊ ते दहा हजार रुपये मिळतात. याच पैश्यातून त्यांचा आणि कुटुंबातील चार सदस्यांचा उदरनिर्वाह देखील चालतो. विशेष म्हणजे सुशीलाबाईने याच व्यवसायातून स्वतःचं घर देखील उभारले आहे. इतर महिलांनी देखील खचून न जाता स्वलंबी बनण्यासाठी मेहनत करावी असा संदेश सुशीलाबाई हराळे यांनी दिला आहे. त्यांच्या या संघर्षगाथाचं सर्वस्तरातून कौतुक होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed