• Sun. Mar 8th, 2026

    धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ, हसन मुश्रीफही पद सोडणार

    धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ, हसन मुश्रीफही पद सोडणार

    Hasan Mushrif to leave Washim Guardian Ministry : हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याच्या पालक मंत्रिपदाची जबाबदारी आहे. याशिवाय ते वैद्यकीय शिक्षण विभागाची धुरा सांभाळत आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त बाहेर येऊन २४ तासही उलटले नाहीत, तोच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून आणखी एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमचे पालक मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच माणिकराव कोकाटे यांच्याही राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

    हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याच्या पालक मंत्रिपदाची जबाबदारी होती. याशिवाय ते वैद्यकीय शिक्षण विभागाची धुरा सांभाळत आहेत. एकीकडे रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत वाद सुरु असताना हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रिपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

    हसन मुश्रीफ यांची तक्रार काय?

    शिवसेना आणि भाजपच्या बहुतांश मंत्र्यांना स्वतःच्याच जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळालेली आहे, मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना गृह जिल्ह्यांपासून लांबच्या ठिकाणांचं पालकत्व मिळत असल्याची तक्रार अनेक मंत्र्यांनी केली होती.

    वारंवर प्रवास करताना अडचणी येत असल्याने मुश्रीफ यांनी पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा ८०० किमीचा प्रवास सातत्याने झेपत नसल्याचं सांगत मुश्रीफांनी पालक मंत्रिपद सोडू देण्याची विनंती अजित पवारांकडे केल्याचं वृत्त आहे.

    दरम्यान, लवकरच वाशिमला नवीन पालकमंत्री मिळणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    धनंजय मुंडेंचा राजीनामा

    दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून गेले काही महिने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. नंतर, काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed