Jitendra Awhad on Santosh Deshmukh Murder Photo : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यानंतर आता त्यांच्या हत्येप्रसंगीचे फोटो समोर आल्याने साऱ्यांचा थरकाप उडाला आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘गेले ८० दिवस आम्ही हेच तर सांगत आहोत. संतोष देशमुख यांच्या फोटोचे वर्णन माझ्या भाषणात मी केलेले आहे. तेव्हा माझी टिंगल टवाळी करीत होते. हे हरामी, नालायक, जल्लाद संतोष देशमुख यांच्यावर लघुशंका करीत होते हे पाहून तुमचे हृदय कुठे हरवले होते. त्यांनी केलेल्या कृतीला राजाश्रय आहे, त्यामुळेच हे घडले आहे.’ तर आव्हाडांनी देशमुखांच्या मुलांबाबतही सहवेदना व्यक्त केली आहे. ‘हे फोटो त्यांची मुलं बघतील तेव्हा त्यांच्या मनाचं काय होईल? देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर आता धनंजय मुंडे यांचा ते आता राजीनामा घेतील.’ असे आव्हाड म्हणाले.
Santosh Deshmukh: संतोष देशमुखांच्या हत्येचे भीषण फोटो पाहून सुप्रिया सुळे कडाडल्या; म्हणाल्या, ‘त्यांना सौ खून माफ का?’
वाल्मिक कराडविरोधात कोणी बोलायला तयार नाही. कारण हा बाहेर आल्यावर आपल्याला मारेल, अशी दहशत समाजात आहे, असे आव्हाडांनी नमूद कले. तर पुढे ते म्हणाले, ‘वाल्मिक कराड याच्या बरेकमध्ये जाऊन त्यांची मालिश करतात काय? एखाद्या जखमी माणसावर हे लघुशंका करतात, यांना लाज नाही वाटत का? धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे सरकार घेणार नाही, म्हणून मी त्यांचा राजीनामा आता मागत पण नाही. पण, महाराष्ट्राने तुम्हाला नक्कीच माफ केलेले नाही. या सगळ्याचा सूत्रधार एकच आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याचा बाप म्हणजे धनंजय मुंडे आहे.’ असे म्हणत आव्हाडांनी पुन्हा मुंडेंना धारेवर धरले आहे.
‘आमच्या बाकी कोणाकडून अपेक्षा नाहीत, मात्र मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती, मी तर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलीची शपथ दिली होती, असेही म्हणत आव्हाडांनी पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची आठवण करुन दिली आहे. तर ‘वाल्मिक कराड माझ्या जातीचा नाही, मात्र मी आजही म्हणेन की त्याला भर रस्त्यात फाशी द्या. आताही खुलेआम सांगतो, कोणाचा तरी गेम इथे होणार आहे. या सर्व प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर आता ११ वाजता फ्लॅश येईल धनंजय मुंडेंचा राजीनामा. आणि आम्ही रोज हा मुद्दा मांडणारच आहोत.’ असे म्हणत आव्हाडांनी मुंडेंसह सरकारलाही कोंडीत पकडले आहे.

