• Tue. Mar 10th, 2026

    बीड बायपास रोडवर विद्यार्थ्याचे अपहरण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

    बीड बायपास रोडवर विद्यार्थ्याचे अपहरण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

    Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विद्यार्थ्याचा पाठलाग करून अपहरण करण्याचा प्रकार घडला. पोलिसांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे आणि निदर्शनामुळे विद्यार्थी सुरक्षित सापडला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हा पोलिसांकडून केला जातोय.

    महाराष्ट्र टाइम्स

    छत्रपती संभाजीनगर : तरुणीसोबत बोलतो म्हणून एका विद्यार्थ्याचा पाठलाग करून अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार बीड बायपास रोडवर घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी मागे लागल्याने आरोपी तरुणाला सोडून पळून गेले. या प्रकरणी अपहरण करणाऱ्या टोळक्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

    सिडको वाळूज महानगरातील देवगिरीनगरात राहणारा पार्थ संदीप सोनवळे (वय १९) हा एमजीएम महाविद्यालयात तिसर्‍या वर्षात शिक्षण घेतो. त्याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीसोबत मैत्री होती. तिच्यासोबत बोलू नको, असे काही टवाळखोरांनी त्याला धमकविले होते. मात्र, मुलगी बोलत असताना त्याने बोलणे सुरू ठेवले होते. त्यामुळे हा राग मनात धरून या टवाळखोरांनी त्याची तीन दिवसांपासून रेकी सुरू केली होती.
    Marathwada : यंदा मराठवाड्याला पाण्याचे नो टेन्शन, धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध इनोव्हा कारने एमजीएमपासून पाठलाग सुरू

    पार्थ हा शनिवारी दुपारी एमजीएम महाविद्यालयातून मित्रासोबत गाडीवरून घरी जाण्यासाठी निघाला होता. या वेळी इनोव्हा कारने एमजीएमपासून पाठलाग सुरू केला. गजानन महाराज मंदिर, सुतगिरणी, संग्रामनगर उड्डाणपूल मार्गे जात असताना रस्त्यावरील गर्दीचा अंदाज घेऊन त्यांनी अपहरण करणे टाळले. मात्र, बायपासवर गेल्यानंतर सवेरा हॉटेलसमोर मोपेड गाडीला इनोव्हा कार आडवी लावून पार्थ याला दुचाकीवरून खाली ओडून एका गल्लीन नेत कारमध्ये कोंबले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याच्या सोबतचा मित्र घाबरला. त्याने हा सर्व प्रकार पार्थच्या नातेवाइकांना लगेचच सांगितला.

    पोलिसांच्या दक्षतेमुळे पार्थ सुखरूप सापडला

    नातेवाइकांनी ही माहिती डायल ११२ वर पोलिसांना दिली. तसेच, स्थानिक नातेवाइकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ताटे यांच्यासह डायल ११२ चे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात सायरन वाजवित पाठलाग सुरू करताच महानुभव चौकात पार्थ सोनवळेला सोडून पळाले. पोलिसांच्या दक्षतेमुळे पार्थ सुखरूप सापडला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *