My Marathi kalasangam 2025: ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘मायमराठी कलासंगम’ सोहळा सोमवार ते बुधवारपर्यंत ‘महाराष्ट्र टाइम्स’ कार्यालय आवार, फोर्ट, मुंबई येथे होत आहे.
हायलाइट्स:
- टपाल तिकिटांद्वारे उलगडणार राज्याची महती
- डॉ.सुमीत पाटील साकारणार बोलींवरील लोककला
- शस्त्रे, नाणी, मोडी कागदपत्रे पाहण्याचीही संधी
उल्हास चोगले हे माहीम येथील रहिवासी. हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये त्यांनी १३ वर्षे नोकरी केली. त्यानंतर टाटा कंपनीत रसायनाशी संबंधित युनिटमध्ये ते जनरल मॅनेजर पदावर कार्यरत होते. येथूनच ते निवृत्त झाले. ही नोकरी सांभाळतानाच त्यांनी टपाल तिकिटे, नाणी जमवण्याचा छंद जोपासला. खरेतर वयाच्या १५व्या वर्षापासून त्यांनी हा संग्रह जमवण्यास सुरुवात केली. ‘छंदासारखा सोबती नाही,’ ही साने गुरुजींनी दिलेली शिकवण त्यांनी आचरणात आणली आणि टपाल तिकिटे, पाकिटे, नाणी त्यांचे खरोखर सोबती बनले. याशिवाय ते कागद, प्लास्टिकपासून बोटी, विमाने यांचे मॉडेलही तयार करतात.
चोगले यांचा हा अनमोल ठेवा कलासंगमच्या माध्यमातून रसिकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. या संग्रहात जवळपास पाच हजार टपाल तिकिटे, पाकिटे आहेत. यात ३५० नावीन्यपूर्ण आहेत. यातील मराठीजनांशी संबंधित टपाल तिकिटे, पाकिटे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. यात शिवाजी महाराज, गडकिल्ल्यांची महती सांगणाऱ्या टपाल तिकिटे आणि पाकिटांचा समावेश आहे. अनेक संतांचे महत्त्वही यातून अधोरेखित होते. वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे यांसारखे महान साहित्यिक, नाट्य, चित्रपट कलावंत, क्रिकेटपटू अशा नामवंतांचे यातून दर्शन होईल.
मुख्य टपाल कार्यालयाचाही सहभाग
मायमराठी-कलासंगममध्ये मुख्य टपाल कार्यालयाचे ( मुंबई) महाराष्ट्राची महती मांडणारे प्रदर्शन सादर होणार आहे. टपाल विभागाने आजवर महाराष्ट्राशी निगडित प्रकाशित अनेक टपाल तिकिटे, फर्स्ट कव्हर प्रकाशित केली आहेत. त्यांचे सादरीकरण टपाल कार्यालयाकडून प्रदर्शनाच्या माध्यमातून होईल. महाराष्ट्रातील समृद्ध संत परंपरा, छत्रपती शिवरायांचा इतिहास, उद्योगपती, क्रीडापटू, महाराष्ट्राची लोककला, पोषाख पद्धती, खानपानाचे पदार्थ, प्रसिद्ध राजकारणी यांचे टपाल तिकिट प्रकाशित झाले होते. त्या टपाल तिकिटांच्या निमित्ताने माहिती देणारे हे प्रदर्शन असेल. शिवचरित्रावर आधारित संपूर्ण मालिकाही या प्रदर्शनात असेल. त्यामध्ये शिवजन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास मांडण्यात येणार आहे.
चला, बोली लिहूया
भाषा ही बोलींनीच समृद्ध होत असते. या बोलींचे संवर्धन करण्यासाठी बोली लिहायला हव्यात, त्या वाचायला हव्यात. या बोली लोककलांवर आधारलेल्या असतात. अशा कला, लोककला, लोकसाहित्य, लोकगीते यांचा संगम मायमराठी-कलासंगम महोत्सवात डॉ. सुमीत पाटील साधणार आहेत. डॉ. सुमीत पाटील हे कला दिग्दर्शक असून, सामाजिक क्षेत्रात कार्य करताना त्यांनी बोली भाषा जतन करण्याचे कार्य सुरू केले आहे. ‘भाषा ही आपली संस्कृती आहे. आपल्या राज्यात दर चार-पाच मैलांवर बोली बदलत जाते. यामुळे प्रमाण भाषेत एखाद्याशी संवाद साधायचा असल्यास तो सुलभरित्या होत नाही. मात्र, स्थानिक बोलीत संवाद साधल्यास तो सुबोध ठरतो, असा अनुभव कामाच्या निमित्ताने विविध ठिकाणी, विविध गावांत गेल्यानंतर आला आहे. त्यामुळेच बोली केवळ बोलून उपयोगाचे नाही, तर ती लिहिली जायला हवी, त्याचे वाचन व्हायला हवे. याच उद्देशाने मी महाराष्ट्राच्या लोककला समोर आणतो’, असे डॉ. पाटील यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर या महोत्सवात डॉ. सुमीत पाटील व श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट हे बोलीवर आधारित लोककलावंतांच्या रचना कॅलिग्राफी स्वरुपात मांडणार आहोत. लोककलाकारांच्या बोलीवर आधारित काही कटआऊट, काही वस्तू त्यात असतील. एक बोलीवर आधारित आकर्षक गोधडीही त्यात असेल.
शस्त्रे, नाणी प्रदर्शनइतिहास समजून घेण्यासाठी प्राचीन वास्तू, कागदपत्रे, तत्कालीन राजवटीत प्रचलित असणारी नाणी आणि विविध प्रकारची शस्त्रे उपयोगी ठरतात. सुदैवाने मध्ययुगीन काळात प्रचलित असणारी विविध प्रकारची शस्त्रे अजूनही अस्तित्वात आहेत. ती पाहून तत्कालीन इतिहास बारकाईने समजून घेता येतो. बदलापूर येथील सुनील कदम आणि त्यांचे सहकारी राहुल खाचणे यांच्या संग्रहात या काळातील विविध प्रकारची शस्त्रे आहेत. या ऐतिहासिक शस्त्रांचे तसेच नाण्यांचे प्रदर्शन पाहण्याची संधी इतिहासप्रेमींना मिळणार आहे. या प्रदर्शनात सुनील कदम आणि राहुल खाचणे यांच्याकडून शस्त्रे, नाणी आणि मोडी लिपीतील कागदपत्रांविषयी माहितीही जाणून घेता येणार आहे.

