• Sun. Mar 8th, 2026
    ‘माझं डोकं चालतंय तोपर्यंत काळजी नको, खुर्चीत बसून संपवेन…’, रामराजे निंबाळकर यांचा कुणाला इशारा?

    Ramraje Nimbalkar : आता माझं वय ७७ झालं. मी थकलो तर नाहीच, वय वाढले. डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवीन, असे विधान रामराजे निंबाळकरांनी केले आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना राजकीय संघर्षासाठी ललकारले आहे.

    Lipi

    सातारा : आता माझं वय ७७ झालं. मी थकलो तर नाहीच, वय वाढले. जुनी दुखणी त्रास देणारच. पण डोकं चालतंय त्याला काय करणार? डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवीन, असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिला आहे. आंदरूड (ता. फलटण) येथील कार्यक्रमात रामराजे बोलत होते. असे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना नव्या राजकीय संघर्षासाठी ललकारले आहे.

    रामराजे म्हणाले, ‘फलटणच्या राजकारणात गावोगावी भांडणं, मारामाऱ्या सुरू होत्या. हे सगळं थांबवण्यासाठी राजकारणात आलो. भांडणाची संस्कृती थांबवून विकास केला. पाणी आणलं. आता माझं वय ७७ झालं. मी थकलो तर नाहीच, वय वाढले. जुनी दुखणी त्रास देणारच. पण डोकं चालतंय त्याला काय करणार? डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवेन.’
    महाराष्ट्र काँग्रेसध्ये नव्या अध्यायाला सुरुवात, मुंबईत उद्या मोठ्या घडामोडींचे संकेत, पडद्यामागे काय घडतंय?
    पुढे रामराजेंनी विधानसभा निवडणूक निकालावर पहिल्यांदा भाष्य केले. ते म्हणाले, तुम्ही निवडणुकीची चर्चा कशाला करता? फार काय आक्रित झालं नाही. सत्ता नसताना जे कार्यकर्ते टिकतात तेच खरे कार्यकर्ते असतात. सत्तेचा उपभोग घेणारेच गेले. जाणाऱ्यांचे नावही घेऊ नका. आता आपणाला आपली दिशा पकडायचीय. आपल्या विरोधात दोन मातब्बर पक्ष होते. मुळातच माझा पिंड अपक्षाचाच आहे. जो आपलं काम करेल तो आपला पक्ष सकाळी १० किंवा ११ वाजता मी कामाला सुरुवात करतो. दिवसातील पहिला दीड तास पोलीस ठाण्याला फोन करायला जातो. सांगा विकास कुठे राहिला? या भानगडीतच दिवस जातो.’

    तर रामराजेंनी ‘राजकारणात वेळ काळ महत्त्वाची असते. कुठे जायचं? काय करायचं? हे मी बघतो. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त एकत्र रहा. दमबाजीला घाबराल तर राजकारण होणार नाही. लढाईच्या तयारीनेच आज आपण सुरुवात केली आहे.’ असे म्हणत पुन्हा हुंकार भरला आहे.

    पुढे रामराजेंनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. ‘फलटणच्या लोकप्रतिनिधीने धोम बलकवडीचे पाणी सोडायला लावले ते तुमच्यासाठी नाही तर स्वतःच्या कारखाना, कारखान्याचे टँक धुण्यासाठी! हे तुम्ही सहन करताय? मग आपण बांगड्या भरलेल्या बऱ्या. असे सत्ताधारी असतील तर कसं होणार?’ असा बोचरा वार त्यांनी केला. तर ‘तुमच्यासाठी मी माझा जीव, आयुष्य व देवाने दिलेलं डोकंही देईल. पैसे मिळतात म्हणून कोणी मतदान इकडचं तिकडं करणार असेल तर हे तालुक्याचं दुर्दैव आहे. मी माझ्यासाठी भांडत नाही. जनतेचा संसार विस्कटण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर ते मी यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही रामराजेंनी दिला आहे.

    ‘संजीवराजेंवर पडलेल्या रेडची चर्चा होतेय. खरंतर माझ्यावरच रेड टाकली असती तर माझा स्टेटस वाढला असता. आपल्याकडे काय आहे सापडायला? राजकारणात सत्य काही का असेना लोकांना तसं वाटतंय ना तेच सत्य आहे. तालुक्यातील विविध समस्या सोडवणारे, विकासकामाचं धनुष्य पेलणारे कोण आहे? लवकरच यांचे बारा वाजायला वेळ लागणार नाही.’ असे म्हणत रामराजेंनी विरोधकांना सुनावले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *