• Sun. Jun 14th, 2026

    मराठी भाषेचा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यात शिवाजी महाराजांचं मोठं योगदान – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 21, 2025
    मराठी भाषेचा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यात शिवाजी महाराजांचं मोठं योगदान – महासंवाद

    मराठी भाषेचं पुनर्जीवन करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केलं असं म्हंटलं तर ते वावग ठरणार नाही इतकं काम शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा जो काळ होता, त्या मध्ययुगामध्ये आणि त्याच्या अगोदर जवळजवळ दोन शतक भारताच्या बहुतांशी भागावर परकीय लोकांनी राज्य केलेलं आहे. जे राज्यकर्ते होते त्यांनी तिकडून येताना आपली भाषासुद्धा घेऊन आलेले होते. आणि मुख्यतः राज्यकारभार जो चालायचा तो त्यांच्या भाषेमध्ये चालायचा. परकीय त्यांच्या भाषेमध्ये चालायचा. शिवाजी महाराजांनी ज्या मुख्यतः ज्या राजवटीतून आपलं स्वराज्य आकाराला आणलं, ते आदिलशाही मधली काही फर्माने आहेत तर आदिलशाहीची फर्माने पहिला भाग जो आहे तो फारसीमध्ये आहे. आणि दुसरा भाग मराठीमध्ये दिलेला आहे. कारण ती त्यांची गरज होती की राज्य जर चालवायचे असेल, इथल्या लोकांना फारसी येत नव्हती. त्याच्यामध्ये कन्नड आणि मराठी असे दोन प्रबळ असणारे भाषेचे समूह त्या राज्यांमध्ये येत होते. आणि त्यामुळं फारसी भाषा राज्य व्यवहाराची भाषा ठेवली आणि त्याचबरोबर इथल्या सामान्य रयतेला समजावं म्हणून मराठी भाषेचा सुद्धा त्यांनी थोडाफार अंगीकार त्यांच्यात केलेला होता, म्हणजे दोन भाषेत द्विभाषिक ती फर्माने असायचीत. आणि या सगळ्या गोष्टींमुळं इथल्या मूळची जी काही आपली मराठी भाषा होती. महाराष्ट्राची जी भाषा होती, मराठी भाषा होती त्या भाषेमध्ये फारसी शब्दांचा खूप मोठा प्रभाव निर्माण झालेला होता.

    शिवाजी महाराज हे असे पहिले राज्यकर्ते आहेत की ज्यांनी या फारसीचा प्रभाव काढून टाकायचा प्रयत्न केला. तो राज्याभिषेका नंतर. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक १६७४ ला झाला. पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मिती त्यांनी नुकतीच सुरू केलेली होती. पुणे जहागीरीतून ते १६४२ ला जिजाऊ साहेब आणि शिवाजी राजे हे बंगळूरवरुन आत्ताच्या कर्नाटकातून पुणे जहागीरीत आलेले होते. शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून जी पत्र निघायची ते जे मायने होते ते पूर्ण फारसी असायचे. शिवाजी राजे जे नाव आणि गावाची नावे सोडली तर ती सगळी फारसी आहेत. हे पत्र आहे ३० ऑक्टोबर १६४० ला लिहिलेलं महाराजांनी. आणि १६७४ पर्यंत महाराजांच्या दरबारातून महाराजांच्या कार्यालयातून जी पत्र निघायचीत ती या फारसी प्रभावानेच निघायचीत. पण ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला, त्या राज्याभिषेकानंतर जसं त्यांनी नवीन सृष्टी तयार केली. धर्म संस्थापना केली. नवीन सृष्टी म्हणजे काय केलं महाराजांनी तर त्यांनी हा जो काय परकीय प्रभाव होता. मराठ्यांच्या सगळ्याच एकंदरीत गोष्टींवर आणि खास करून भाषेवर तो प्रभाव कमी करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले.

    राज्याभिषेका नंतर जे पहिलं पत्र निघालं त्याच्यामध्ये मायना बदलला आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे संस्कृत आणि मराठी यांचे प्रभाव असणारे पत्र निर्माण होऊ लागले. शिवाजी महाराजांनी काय केलं की जो फारसीचा प्रभाव होता तो पूर्ण प्रशासकीय व्यवहारातून सुद्धा काढायचा प्रयत्न केला. या पत्रांचा संशोधकाने अभ्यास केलेला आहे, खास करून यु मु पठान नावाचे आपले मराठीचे एक मोठे साहित्यिक होऊन गेले, फारसी आणि मराठी हा त्यांचा दोन्हीवर हातखंडा होता. त्यांनी शिवकालीन राज्याभिषेकाच्या अगोदरची पत्र आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतरची पत्र याच्या मधल्या शब्दांचा अभ्यास केला. आणि त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका नंतर जी पत्र छत्रपतींच्या दरबारातून निघायचीत त्याच्यामध्ये अनेक मराठी शब्द, संस्कृत शब्दांचा अंतर्भाव सुरू झाला. म्हणजे अगोदर जी पत्र निघायचीत त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा साहेब हा उल्लेख यायचा. त्यांच्या पत्रामध्ये नंतर तो स्वामी असा शब्द यायला लागला. म्हणजे महाराजांनी हा इतका प्रभाव मोठा होता या सगळ्या राज्यसत्तांचा, २५०-३०० वर्षाच्या परकीय राज्यसत्तांनी नुसतं लष्करी राज्य केलेलं नव्हतं तर त्यांचं एकप्रकारे भाषिक साम्राज्य सुद्धा या आपल्या मराठी भाषेवर निर्माण झालं होतं. ते शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका नंतर कमी केलं.

    महाराजांनी व महाराजांच्या नंतरचे जे सर्व राज्यकर्ते आहेत त्या सगळ्या राज्यकर्त्यांच्या मुद्रा ज्या आहेत त्या संस्कृत मध्ये निर्माण झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी मोठं योगदान दिलं. त्यांच्या आधीच्या काळात, प्रशासन, लष्करी व्यवहार आणि राजकीय दस्तऐवज फारसी भाषेत असत. हे तत्कालीन परकीय सत्ता (मुघल, आदिलशाही, निजामशाही इत्यादी) आणि त्यांचे प्रभाव यामुळे होत असे. पण शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मराठी आणि संस्कृत भाषांना राजकारभारात अधिक महत्त्व दिलं. त्यांनी राजव्यवहार कोश तयार केला, तो प्रशासकीय व्यवहारात मराठी आणि संस्कृत शब्दांचा उपयोग करण्यासाठी तयार करण्यात आला. फारसीच्या प्रभावाखाली असलेले अनेक शब्द गाळून, त्याऐवजी भारतीय भाषांतील शब्दांचा उपयोग करण्यावर भर दिला. शिवकालीन पत्रांमध्येही हा बदल दिसून येतो. पूर्वीच्या पत्रांमध्ये “साहेब” हा शब्द असायचा, तर नंतरच्या पत्रांमध्ये “स्वामी” किंवा तत्सम शब्दांचा वापर होऊ लागला.

    त्याशिवाय, मुद्रा (शिक्का) यामध्येही हा बदल स्पष्ट होतो. जिजाऊ साहेब आणि शहाजी महाराज यांच्या मुद्रांमध्ये फारसी प्रभाव होता, पण शिवाजी महाराजांच्या मुद्रा संस्कृत छंदात रचलेल्या होत्या. हा भाषिक बदल फक्त प्रशासनापुरता मर्यादित नव्हता, तर त्याचा प्रभाव पुढील छत्रपतींच्या कारकिर्दीतही दिसतो. छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराज, ताराबाई यांच्याही काळात मराठीत अधिकाधिक प्रशासनिक कामकाज होऊ लागलं. यामुळे मराठी भाषेचा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यात शिवाजी महाराजांचं मोठं योगदान आहे. त्यांनी मराठीला अभिमानाची भाषा बनवलं, आणि हा वारसा पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात कायम राहिला. विशेषतः शिवाजी महाराजांच्या काळात मराठी भाषेचा वापर, फारसीचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न, आणि राजव्यवहार कोषाची रचना ही सर्व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे.

    -इतिहास तज्ञ, इंद्रजित सावंत

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed