• Tue. Jun 16th, 2026

    शिवजन्मोत्सवात अदिती तटकरेंना तब्बल तीन तास विलंब, भर उन्हात शाळकरी विद्यार्थ्यी खोळंबले, शिवप्रेमी नाराज

    शिवजन्मोत्सवात अदिती तटकरेंना तब्बल तीन तास विलंब, भर उन्हात शाळकरी विद्यार्थ्यी खोळंबले, शिवप्रेमी नाराज

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Feb 2025, 9:12 am

    Raigad News: महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उशिरा येण्यामुळे, शिवजयंती उत्सवासाठी आलेल्या हजारो शाळकरी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यापासून भर उन्हात ताटकळत बसावे लागण्याची वेळ आली. त्यामुळे, रायगडावर शिवजयंती उत्सवानिमित्त जमलेल्या शिवप्रेमींनी शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमुलकुमार जैन, रायगड : महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची काल म्हणजे, १९फेब्रुवारी रोजी जयंती साजरी करण्यात आली. संपूर्ण देशभरात शिवरायांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या शौर्याची, भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पूजले जातात. महाराजांची ३९५ शिवजयंती रायगडावर साजरी होत असताना, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उशिरा येण्यामुळे, शिवजयंती उत्सवासाठी आलेल्या हजारो शाळकरी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यापासून भर उन्हात ताटकळत बसावे लागण्याची वेळ आली. त्यामुळे, रायगडावर शिवजयंती उत्सवानिमित्त जमलेल्या शिवप्रेमींनी शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

    महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर, तारखेप्रमाणे ३९५ शिवजयंती उत्सव महाराष्ट्र शासनाकडून साजरी केली गेली. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर येतात. काल(१९ फेब्रुवारी) या सोहळ्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शिवजयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. सकाळी आठ वाजल्यापासून रायगडावर हजारो शिवभक्त दाखल झाले होते. मात्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या तब्बल बाराच्या सुमारास रायगडावर दाखल झाल्याने शिवजयंती उत्सवाला तीन तास विलंब झाला.

    किल्ले रायगडावर साजरा झालेल्या शिवजयंती उत्सवासाठी आदिती तटकरे यांच्याबरोबर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चित्रपटात साकारणारे विकी कौशल हे गडावर येणार असल्याने या कार्यक्रमासाठी तब्बल तीन तास विलंब झाला. यामुळे या कार्यक्रमासाठी आलेल्या माणगांव तालुक्यातील, जावळी येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांना भर उन्हात शिवजयंती उत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांची वाट बघत ताटकळत बसावे लागले. मात्र प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली नव्हती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना खिशातले पैसे खर्च करून बाटल्या विकत घ्याव्या लागत होत्या.

    याला जबाबदार कोण?

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबारातील असणाऱ्या मेघडंबरीवर दरवर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सजावट केली जाते. मात्र प्रशासनाने यावर्षी तात्पुरत्या दिखाऊ स्वरूपात मेघडंबरीवर आपले सोपस्कार पार पाडले. तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान सभामंडप व शामियाना उभारण्यात येतो. तसा शामियाना किंवा सभामंडप प्रशासनाने शिवजयंतीच्या सोहळ्यानिमित्त का उभारला नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकंदरीत राजकीय सोयीसाठी शिवजयंती उत्सवाचे सोपास्कार पार पाडणाऱ्या प्रशासनावर, राज्य सरकार की लोकप्रतिनिधी मेहरबान झाले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed