Chembur School Bus Accident Vihan Death Case : मुंबईतील चेंबूरमध्ये झाड कोसळून मृत्यू झालेल्या विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याच्या वडिलांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ते आता कायदेशीर लढाई लढणार आहेत.
पहिला अहवाल अमान्य
चेंबूर दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीसाठी महापालिका प्रशासनाने प्रारंभी दोन उपायुक्तांची समिती गठीत केली होती. या समितीने सादर केलेला सविस्तर अहवाल महापौर रितू तावडे तसेच महापालिका सभेने अमान्य केला होता. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, अहवालात सखोल तपास व कठोर दंडात्मक शिफारशींचा अभाव असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच त्रयस्थ तज्ज्ञाची नेमणूक करून फेरचौकशीचे निर्देश देण्यात आले होते. फेरचौकशीसाठी महापालिकेने ३० जुलैला प्रा. डॉ. संजय व्ही. देशमुख यांची एक सदस्यीय समिती नेमली. प्रा. डॉ. संजय व्ही. देशमुख हे वनस्पतीशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी कांदळवनांबाबत भरीव कार्य केले असून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणूनही जबाबदारी भूषवली आहे. सध्या ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (मुंबई) येथे अधिवक्ता प्राध्यापक तसेच एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे उपाध्यक्ष आहेत.
CSMT Redevelopment : मुंबईकरांना आणखी पंधरवडाभर त्रास! सीएसएमटी पुनर्विकासासाठी कधीपर्यंत रेल्वेगाड्यांची रखडपट्टी, महत्त्वाच्या गाड्यांमध्ये बदल
‘तरीही अहवाल अमान्य’
या घडामोडींबाबत विहान श्रीवास्तव याचे वडील गौरव श्रीवास्तव यांनी भाष्य केले. ‘महापालिकेकडून नियुक्त एक समिती सदस्य डॉ. देशमुख यांच्या पात्रतेबद्दल बिलकुल शंका नाही. मात्र ही चौकशी समिती केवळ झाड कसे पडले हे स्पष्ट करण्यासाठी आहे की, या घटनेला जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांना उत्तरदायी ठरवण्यासाठी आहे?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एक सदस्य समितीच्या वैधतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘यापूर्वीच्या समितीत दोन सदस्य होते. तरीही अहवाल अमान्य झाला. सध्याच्या समितीत एकच तज्ज्ञ आहेत.
‘लवकरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेऊ’
समितीत निवृत्त न्यायाधीशांसोबत इतर तज्ज्ञांचाही समावेश असायला हवा होता. केवळ एका सदस्याच्या समितीची नियुक्ती कशी समर्थनीय आहे? असा प्रश्नही त्यांनी केला. आगामी अहवालातून काही ठोस निष्पन्न होईल का, याबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली. ‘याआधी सादर झालेल्या अहवालातील मुद्दे पाहता, त्यावर आम्ही कायदेतज्ज्ञाचा सल्ला घेत आहोत. लवकरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेऊ,’ असे गौरव श्रीवास्तव यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे बोलताना स्पष्ट केले. नवीन अहवालासाठी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. त्या अहवालाची वाट पाहावी की नाही, याबद्दल कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
Mumbai Crime : आईला अन् तरुणीला अश्लील Video पाठवले, लेकीची माऊलीला शेवटची व्हॉट्सॲप रेकॉर्डिंग; मुंबईतल्या तरुणीनं लोकलमध्ये आयुष्य संपवलं
पहिल्या अहवालात रस्ते, उद्यान विभागाला क्लीनचिट
चेंबूरमध्ये झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या चौकशीसाठी दोन उपायुक्तांची समिती नेमून चौकशी करण्यात आली. त्यांनी आपला अहवाल मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सादर केला. यामध्ये रस्ते विभाग, तसेच उद्यान विभागाला क्लीनचिट देण्यात आली. तर रस्ते कंत्राटदारासह कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागाराला किरकोळ दंड आकारण्यात आला होता. या प्रकरणी आधीच मुंबई महापालिकेकडून रस्ते विभागातील दुय्यम अभियंता आणि सहायक अभियंत्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
