• Mon. Mar 9th, 2026
    शिंदे गटाचे विदर्भावर लक्ष, ‘ऑपरेशन टायगर’चा पुढील अध्याय; एकनाथ शिंदे अ‍ॅक्टिव मोडवर

    Shivsena Eknath Shinde : शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. आभार सभेच्या माध्यमातून ‘ऑपरेशन टायगर’ व सदस्य नोंदणी राबवले जाणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. आभार सभेच्या माध्यमातून ‘ऑपरेशन टायगर’ व सदस्य नोंदणी राबवले जाणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणावर विजयी झालेल्या आमदारांच्या मतदारसंघात आभार सभांच्या माध्यमातून संघटन बळकट केले जाणार आहे. सदस्य नोंदणी आणि पक्ष प्रवेशावर भर राहील. रामटेकमध्ये पाचव्यांदा विजयी झालेले राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासाठी शिंदे कन्हान येथे २० फेब्रुवारी रोजी आभार सभा होणार आहे.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मंत्री विदर्भातील आभार सभेची सुरुवात कन्हान येथून करणार आहेत. प्रतिकुल स्थितीत त्यांनी राज्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, शेतकरी व अन्य घटकांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री व ‘कॉमन मेन’ अशी त्यांची ओळख झाली. पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिला. मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी पक्षाच्या सर्व विधानसभा मतदारसंघात ते जाणार आहेत, अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
    रत्नागिरीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप, ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, दापोली नगरपंचायतीत शिंदेंच्या शिवसेनेकडून गेम
    एकनाथ शिंदे यांच्या आठवड्यातून दोन सभा होणार आहेत. त्यांनी विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी ते स्वत: येणार आहेत. संघटन बांधणीवर त्यांचा भर आहे, असे आमदार कृपाल तुमाने यांनी सांगितले. विदर्भात मोठ्या प्रमाणात माजी आमदार व अन्य नेते शिवसेनेत प्रवेशासाठी रांगेत आहेत. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. महायुती भक्कम असून महाआघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार काय निर्णय घेतील, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे, असेही आशिष जयस्वाल म्हणाले.

    संपर्क मंत्री नियुक्ती केले जाण्याबाबत काहीच माहिती नाही. भाजप करत असल्यास प्रत्येक पक्षाला विस्ताराचा अधिकार आहे. तिन्ही पक्ष विस्तार करत असल्यास महायुती आणखी भक्कम होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या याचा निर्णय अद्याप झालेला नाही. स्थानिक स्थितीनुसार विचार केला जाईल. सद्यस्थितीत महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत, असेही आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले. पक्षाने २४ जानेवारीपासून ‘शिवकार्य’ सदस्य नोंदणी अभियान सुरू केले. डिजिटल सदस्य केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस संपर्क प्रमुख मंगेश काशीकर, जिल्हा प्रमख संदीप इटकेलवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed