उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चेवर दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यानंतर याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
“शिंदे आणि फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरु आहे, हे धादांत खोटं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्हाला कोणत्या बातम्या मिळाल्या नाहीत की कोल्ड वॉर असं रुप देतात. असं काही नाही. आमचं सगळं चांगलं आहे. जनतेने आम्हाला भरपूर पाठिंबा दिलेला आहे”, असं अजित पवार म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्याला मोठी मदत
“आम्ही राज्याच्या भल्याच्या दृष्टीने पावलं उचलत आहोत. अर्थसंकल्पात केंद्राने राज्याला काय दिलं आहे याचं प्रेजन्टेशन झालेलं आहे. यंदा केंद्राने सव्वा ते दीड लाख कोटी रुपये 50 वर्षाच्या रिपेमेंटवर बिनव्याजी वेगवेगळ्या राज्यांनी घेऊन जा असं सांगितलं आहे. त्यात जास्तीत जास्त निधी आणायचा हा सरकारचा प्रयत्न आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“आमचं 3 तारखेला अधिवेशन आहे. त्यावेळी आम्ही शेवटच्या पुरवण्या मागण्यांवर चर्चा करु. त्या मंजूर करुन घेऊ. विनोयजन बिल मंजूर करुन घेऊ. त्यानंतर आपल्या राज्याचा अतिशय चांगला अर्थसंकल्प, राज्याला विकासाच्या दिशेला नेणारा अर्थसंकल्प मांडू”, असं अजित पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका असा इशारा दिला आहे. हा इशारा कुणाला दिला आहे? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारलं असता, “उबाठाच्या प्रमुखांना इशारा आहे”, असं उत्तर अजित पवारांनी दिलं.

