पुण्यात थैमान घालणाऱ्या जीबीएस आजाराचा राज्यात आता विळखा वाढताना दिसत आहे. या आजाराची साथ आता राज्यभरात संक्रमित होताना दिसत आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जीबीएसबाधित रुग्ण आढळत आहे. सुरुवातीला हा दुर्मिळ आजार दुषित पाण्यामुळे होत असल्याचा दावा केला जात होता. पण अजित पवार यांनी याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे या आजाराची लागण होत असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.
जीबीएस आजाराचा वाढता विळखा पाहता आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. पण रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. या दरम्यान अजित पवार यांनी या आजाराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कच्चे मांस खाल्ल्यामुळे जीबीएसची लागण होत आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“मधल्या काळात एक आजार उद्भवला. आपल्याला वाटलं की पाण्यामुळे या आजाराची लागण रुग्णांना झालं. पण खडकवासला परिसरातील काहींचं म्हणणं आहे की, कोंबड्यांमुळे या आजाराची लागण झाली. त्याबाबत अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. मी आता राजेंद्र भोसले यांना प्रेसनोट काढायला सांगणार आहे. तिथल्या कोंबड्यांची व्हिल्हेवाट लावायची गरज नाही. फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अजित पवार यांनी आज दिली.
‘आता ब्रह्मास्त्र काढणार’, करुणा शर्मा यांचा मोठा इशारा, धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार?
राज्यात दिवसभरात तिघांचा जीबीएसमुळे मृत्यू
जीबीएस आजार दिवसेंदिवस राज्यातील रुग्णांचा बळी घेताना दिसतोय. राज्यात दिवसभरात 3 रुग्णांचा जीबीएस आजाराने मृत्यू झाला आहे. सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका सहा वर्षाचा मुलाचा आणि 60 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. नागपूरच्या शासकीय रुग्णालयात 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय. तसेच दोघांवर सध्या आयसीयूत उपचार सुरु असल्याची माहिती आहे. मिरजच्या शासकीय रुग्णालयात सध्या 7 जीबीएसबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

