शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. राजन साळवी यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता पक्षातील आणखी एक बडा नेता नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा पाहता आज उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाल्याची देखील माहिती आहे.
भास्कर जाधव यांच्या ‘या’ वक्तव्याने नाराजीच्या चर्चा
“बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, माझा शिवसैनिक हा निखारा आहे. त्याच्यावर थोडी राख साचली की त्याला फुंकर मारावी लागते. एकदा फुंकर मारली आणि ती राख उडून गेली तर तो निखारा पुन्हा प्रज्वलित होतो. पुन्हा त्या निखाऱ्यातून आग ओकायला सुरुवात होते. शिवसैनिक हा थोडीसी राख साचलेल्या निखाऱ्यासारखा आहे. त्याच्यावर साचलेली थोडीसी राख झटकण्याची गरज आहे”, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे. तसेच “मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भास्कर जाधव यांच्यासोबत काल आमची चर्चा झाली. आम्ही आज एकत्र भेटत आहोत. काही कुणाची खंत असेल तर आम्ही चर्चा करु”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मंत्री उदय सामंत काय म्हणाले?
“भास्कर जाधव हे विधीमंडळातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं संघटन कौशल्य आहे. ते महाराष्ट्र फिरु शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. अशा व्यक्तीचं भविष्यात आम्हाला मार्गदर्शन मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करु”, असं सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केलं.
Ajit Pawar : सख्खा भाऊ सोबत नाही, अजित पवारांकडून उघडपणे खंत व्यक्त
अंबादास दानवे काय म्हणाले?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “भास्कर जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. मी लहान शिवसैनिक आहे. त्यावर जास्त बोलणार नाही. पक्षप्रमुख भास्कर जाधव यांची समजूत काढतील. पक्षप्रमुख आणि त्यांचं बोलणं नेहमी सुरु असतं. त्यांनी एखादी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यावर पक्षप्रमुख नाराज आहेत असं होत नाही”, अशी सारवासारवची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

