Sinner Crime : जुन्या भांडणाची कुरापत आणि भावकीच्या वादातून तालुक्यातील दातली येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
सागर यांची पत्नी, भाऊ, भावजयी तिघेही पोलिस दलात कार्यरत आहेत. या घटनेत जगन्नाथ नरहरी भाबड (५०), अक्षय म्हाळू भाबड (२८), म्हाळू नरहरी भाबड (५३), सुयोग म्हाळु भाबड (२२) सर्व रा. दातली, ता. सिन्नर आणि ओमकार विजय डोमाडे (२१, रा. देशवंडी, ता. सिन्नर) असे पाच जण जखमी झाले आहेत. सागरसह या पाचही जणांना उपचारासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सागर याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर उर्वरित पाच जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सागर याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्याचे नातलग आणि मित्रपरिवाराने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. अनुचित घटना घडू नये म्हणून सिन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड, मुसळगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा ग्रामीण रुग्णालयात बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता. त्यामुळे रुग्णालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, दोन गटात झालेल्या या हाणामारीत दुसऱ्या गटाचे जखमी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुसळगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
भिकारीही एक रुपया घेत नाही, आम्ही पीकविमा देतो; माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त विधान
शिक्षा न झाल्यास आत्महत्या
या घटनेत गंभीर जखमी झालेले सागरचे चुलत भाऊ आणि चुलते यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत असताना त्यांनी टाहो फोडला. सागरच्या मारेकऱ्यांना अटक होऊन शिक्षा झाली नाही, तर पोलिस ठाण्यासमोरच आत्महत्या करण्याचा इशारा सागरचा चुलत भाऊ आणि चुलत्यांनी दिला.
‘मी साधा माणूस, मला हलक्यात घेऊ नका!’ उद्धव ठाकरेंआडून उपमुख्यमंत्री शिंदेंचा भाजपला इशारा
सागरचे वडील मारुती भाबड यांना मेंढी येथील व्यसनमुक्ती केंद्रात दारू सोडविण्यासाठी ठेवले होते. बुधवारी त्यांनी या केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूला दोन दिवस उलटत नाही तोच भाऊबंदकीतून झालेल्या मारहाणीत सागरचा मृत्यू झाल्याने भाबड कुटुंबावर दोन दिवसात दोन आघात झाले.

