• Mon. Mar 16th, 2026

    आमचे हे गेले, मी सगळे पैसे न्यू इंडिया सहकारी बँकेत भरले, आता माझं बरं-वाईट… खातेदार भाववश

    आमचे हे गेले, मी सगळे पैसे न्यू इंडिया सहकारी बँकेत भरले, आता माझं बरं-वाईट… खातेदार भाववश

    New India Co-operative Bank RBI Restrictions : रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले. यानंतर आपले पैसे परत मिळवण्यासाठी बँकेबाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत.

    New India Co-operative Bank : आमचे हे गेले, मी सगळे पैसे न्यू इंडिया सहकारी बँकेत भरले, आता माझं बरं-वाईट… खातेदार भाववश

    मुंबई :‘जुनी बँक म्हणून विश्वासाने पैसे ठेवले. सारे काही सुरळीत सुरू होते. गुरुवारपर्यंत बँक सुरू होती आणि अचानक शुक्रवारी बँकेचे व्यवहार बंद झाले. आता आमचे काय होणार, जगू की मरू…’ अशा भावनांचा कल्लोळ न्यू इंडिया सहकारी बँकेच्या खातेदार, ठेवीदारांच्या मनात दाटला आहे. आपली आयुष्याची पुंजी मिळवण्यासाठी बँक ग्राहकांनी शुक्रवारी बँकेच्या शाखांसमोर गर्दी केली. परंतु पैसे कधी काढता येणार, यासंबंधी ठोस आश्वासनाविनाच त्यांना घरी परतावे लागले.

    रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले. यानंतर आपले पैसे परत मिळवण्यासाठी बँकेबाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. ‘मी १० रुपये भरून बँकेत अनेक वर्षांपूर्वी खाते उघडले. काही महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाले. त्यानंतर सर्व रक्कम एका बँकेतून काढून या बँकेत भरली आणि आज बँकेची ही स्थिती झाली. ते म्हणतात तीन-चार महिन्यांनी पैसे मिळतील. मग आमच्यासारख्या वय झालेल्यांचे त्या काळात बरे-वाईट झाले तर पैसा गेला. माझा पैसा मिळाला नाही, तर करायचे काय, मला कुणाचाही आधार नाही…’ अंधेरी परिसरातील अंजना साटम हतबलता व्यक्त करत होत्या.
    New India Co-operative Bank : कुणी लग्नासाठी जमवले, कुणाच्या आयुष्याची पुंजी पणाला; RBI चे निर्बंध, मुंबईतील बँकेबाहेर खातेदारांच्या रांगा
    ‘विश्वासार्ह बँक म्हणून मी या बँकेत बचत व चालू, अशी दोन्ही खाती उघडलेली होती. हे निर्बंध आल्यानंतर शुक्रवारी सात तास खातेदार शाखेबाहेर उभे होते. पण पैसे काढू दिले नाहीत. ठोस माहितीही देण्यात आली नाही,’ असे विलेपार्ले येथील अविनाश साठे म्हणाले.
    New India Co-operative Bank : तुमच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी… न्यू इंडिया सहकारी बँक ग्राहकांना सोमय्यांचा महत्त्वाचा मेसेज
    अंधेरीतील रामदास मसूरकर यांनी सन १९८७ मध्ये बँकेत खाते उघडले. ‘आजुबाजूच्या सर्वसामान्यांचा पैसा या बँकेत आहे. पण अचानक बँकेचे काम बंद पडले. याचा आम्हा खातेदारांना धक्का बसला,’ असे ते सांगतात. बँकेच्या ठेवीदारांना वाचविण्यासाठी विरेंद्र भोरे या खातेदारांनी संघटित होण्याची तयारी केली आहे. ‘या बँकेबाबत असे काही होईल, हे वाटलेच नव्हते. मी सुदैवाने कालच ५० हजार रुपये बहिणीला देण्यासाठी काढल्याने तितकी रक्कम वाचली. मात्र आता एकत्रित होऊन लढा द्यावा लागेल’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्या.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed