गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत घडलेल्या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा निर्माण केली. कारण दिल्लीत दोन दिवसांत दोन घटना देखील तशाच घडल्या. त्यानंतर दिल्लीत आता तिसरी मोठी घटना घडणार का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या पुरस्कारावरुन राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच दिल्लीत डिनर डिप्लोमसीमुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला. शिवसेनेकडून सध्या ऑपरेशन टायगर राबवला जात असल्याची चर्चा आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या लोकप्रतिनिधींसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. यानंतर शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी हजेरी लावली आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अखेर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना खासदारांना योग्य सूचना द्यावा लागल्या. या दोन राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राचं लक्ष वेधलं असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर जात असल्याची माहिती आहे. त्यांचादेखील दिल्ली दौरा हा वादळी ठरतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर ते आज रात्री लगेच दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक गृह विभागाशी संबंधित असणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला
फडणवीस दिल्लीहून प्रयागराजला जाणार
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील बैठकीनंतर प्रयागराजला जाणार असल्याची माहिती आहे. प्रयागराजला सध्या महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महाकुंभ मेळा 144 वर्षांनी एकदाच आयोजित केल जातो. त्यामुळे अनेक दिग्गजांनी प्रयागराजला महाकुंभ मेळाव्यात जावून गंगेत स्नान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक दिग्गज नेत्यांनी कुंभमेळ्यात जावून शाही स्नान केलं आहे. यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे देखील महाकुंभ मेळ्याला जाणार आहेत. ते कुंभ मेळ्यात जावून गंगेत स्नान करणार आहेत. महाकुंभ मेळा सुरु असताना तिथे गंगेत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो, अशी ख्याती आहे. त्यामुळे जगभरातील भाविक इथे भेट देत आहेत.

