• Sun. Jul 26th, 2026
    PM Narendra Modi : महाराष्ट्र मागे नाही, पंतप्रधान मोदींकडून नाशिकमधील उपक्रमाची दखल, ‘मन की बात’मध्ये केला उल्लेख

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नाशिकमधील जिल्हा संवर्धन उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात या उपक्रमाची दखल घेतली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ केली. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलसंवर्धन उपक्रमाची त्यांनी दखल घेत उल्लेख केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात कॅच द रेन (Catch the Rain) अभियान राबविण्यात येत आहे. त्यात लोकसहभाग, विभागीय समन्वय आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जलसुरक्षा बळकट करण्यात येत आहे. यामध्ये जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना, नाला खोलीकरण व रुंदीकरण, कृत्रिम भूजल पुनर्भरण विहिरी (रिचार्ज शाफ्ट), पर्जन्यजल संधारण, सूक्ष्म सिंचन, जलअर्थसंकल्प (वॉटर बजेटिंग), जलकार्यक्षम शेती तसेच जलतारा यांसारख्या उपक्रमांमुळे जलसंवर्धनाला मोठी चालना मिळत आहे.

    वनहक्क कायदा (FRA) अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या जमिनींवर मृदा व जलसंधारणाची कामे करून त्या जमिनी उत्पादक आणि शाश्वत करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांबरोबरच भूजल पुनर्भरण, पर्जन्यजल संधारण, पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि जलउपलब्धता वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

    कॅच द रेन (Catch the Rain) अभियानाचा मुख्य उद्देश पावसाच्या प्रत्येक थेंबाचे स्थानिक पातळीवर संवर्धन करून जलसुरक्षा मजबूत करणे हा असून, त्यासाठी शासन, ग्रामपंचायती, विविध विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. लोकसहभागाच्या बळावर जिल्ह्यात जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे.

    नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून जलसंधारण उपक्रमांचे सादरीकरण

    या उपक्रमाची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या National Water Mission अंतर्गत आयोजित ५५ व्या Water Series Webinar मध्ये वक्ते म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी “Best Practices of Water Management” या विषयावर आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारमध्ये ‘Catch the Rain’ अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध जलसंधारण उपक्रमांचे सादरीकरण केले होते.

    या सर्व उपक्रमांची प्रधानमंत्री मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दखल घेतली. त्यांनी सांगितले की, ‘मन की बात’च्या गेल्या भागात मी तुमच्याशी ‘कॅच द रेन’ पावसाचं पाणी अडवण्याच्या मोहिमेविषयी चर्चा केली होती. पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याच्या या मोहिमेला लोकचळवळ बनवण्याचं आवाहन मी केलं होतं, असं मोदी म्हणाले.

    नरेंद्र मोदी काय-काय म्हणाले?

    ‘कॅच द रेन’चा संदेश अतिशय सोपा आहे – जिथे पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, पाणी तिथेच साठवा. म्हणूनच 4 जुलैपासून देशभरात एक विशेष मोहीम राबवली जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याचं संकलन, भूजल पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी गती दिली जात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

    “मला अत्यंत आनंद होत आहे की, गावं असोत की शहरं, पंचायती असोत की सामाजिक संस्था – सर्वत्र लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आहे. कुठे जुन्या तलावांमधील गाळ काढला जात आहे, तर कुठे विहिरी आणि बारवांना पुन्हा नवसंजीवनी दिली जात आहे. बंद पडलेले बोअरवेल-नलकूप आता भूजल पुनर्भरण करण्याचं माध्यम बनत आहेत”, असं मोदी म्हणाले.

    मोदींनी नाशिकचा केला उल्लेख

    “मध्य प्रदेशातील सिंधी जिल्ह्यात सुमारे दीड हजार तलाव निर्माण करण्यात आले आहेत. नरसिंगपूरमध्ये ‘अमृत सरोवरं’ विकसित करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंद्यालमध्ये सर्व ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या असून, तेथील जुन्या तलावांचं पुनरुज्जीवन करून त्यांचा पुन्हा उपयोग सुरू करण्यात आला आहे”, अशी माहिती मोदींनी दिली.

    आपली शहरही मागे नाहीत. छत्तीसगडमधील कोरबा, ओदिशामधील भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशातील विजयनगरम इथेही या अभियानाचे उत्साहवर्धक परिणाम दिसून येत आहेत. आपणही आपल्या परिसरातील एखाद्या तलावाची, विहिरीची किंवा बारवाची जबाबदारी स्वीकारूया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा निश्चय करूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब हा येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याची सर्वात मोठी पुंजी ठरेल, असा दावा मोदींनी केला.

    पावसाचे पाणी जतन करण्यासाठी सुरू असलेल्या Catch the Rain अभियानात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. गाव, शहर, पंचायत आणि स्वयंसेवी संस्था जलसंधारण, भूजल पुनर्भरण, तलाव पुनरुज्जीवन आणि वृक्षलागवडीत सहभागी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.