राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर या चर्चा आगामी काळात खऱ्या ठरण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, विनायक राऊत यांनी साळवी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
विनायक राऊत यांचा साळवींवर घणाघात
“मला कीव करावशी वाटते आणि राजन साळवी यांची खूप दया येते. प्रत्येक ठिकाणी मला भाजपात जायचं आहे. देवेंद्र फडणवीस मला हे देणार, ते देणार, विधान परिषद देणार असं सातत्याने सांगत होते. पण भाजप पक्षाने त्यांची दारे कायमची बंद केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना साधी भेट सुद्धा दिली नाही. ज्या सामंत कुटुंबियांच्या विरोधात तथाकथित आरोडी ठोकण्याचं काम करत होते, त्याच सामंत कुटुंबियांचं पालकत्व राजन साळवी यांना रत्नागिरीत स्वीकारावं लागणार. हा नियतीने त्यांच्यावर उगवलेला सूड आहे”, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला.
“एखाद्याला बेईमानी करायचीच झाली तर कुणाच्या तरी डोक्यावर खापर फोडण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून त्यांनी माझ्यावर आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. राजन साळवी यांनी 35 वर्षे शिवसेनेत काम करत असताना, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं होतं”, असं विनायक राऊत म्हणाले.
पडद्यामागे खुसूरफुसूर, शिंदेंच्या शिलेदारांनी घेतली शरद पवारांची भेट, नव्या राजकीय समीकरणाचे संकेत?
‘आम्ही त्यांना निष्ठावंत मानत होतो, पण…’
“शिंदे गटाचे कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी राजापूरमध्ये जाहीर सभेत राजन साळवी यांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून कसे पैसे घेतले हे जाहीरपणे सांगितलं होतं. आम्ही त्यांना निष्ठावंत मानत होतो. पण त्यांचा निष्ठेचा बुरखा हा त्याचवेळेला निलेश राणे यांनी फाडला. उदय सामंत आणि किरण सामंत यांना शह देण्यासाठी शिंदे गटाने राजन साळवी यांचा वापर करण्याचा केविलवाणा प्रयत्न असेल”, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

