• Thu. Jun 11th, 2026

    ठाकरेंचा शिलेदार गळाला, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…म्हणून मी मुख्यमंत्री झालो’

    ठाकरेंचा शिलेदार गळाला, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…म्हणून मी मुख्यमंत्री झालो’

    एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले नेते राजन साळवी हे आता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ठाणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ख्याती असलेले नेते राजन साळवी यांनी अखेर ठाकरेंची अधिकृतपणे साथ सोडली आहे. साळवी यांनी ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी यांचा लवकरच शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या वृत्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    “जे लोकं येतील त्यांचं स्वागतच आहे. कारण गेल्या अडीच वर्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांच्या शिवसेनेत आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषदेतील अनेक नेते शिवसेनेत दाखल झाले. बाळासाहेबांची शिवसेना पुढे न्यायची आहे. वाढवायची आहे म्हणून बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्ही स्थापन केलं. आम्ही अडीच वर्षे काम केलं. हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे लोकं कामावर विश्वास दाखवत आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    “हे काम करणारं सरकार आहे. घरी बसणारं सरकार नाही. हे रिझल्ट देणारं, फिल्डमध्ये उतरुन 24 तास काम करणारं सरकार आहे. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आम्ही एवढे लोकपयोगी कामे, प्रकल्पे केली, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय घेतले. आमची शिवसेना विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. त्यामुळे अनेक लोकं आमच्या शिवसेनेत येत आहेत. त्यांचं मी स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

    ‘विरोधकांनी महादजी शिंदे यांचा अपमान केला’

    “अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. महादजी शिंदे महापराक्रमी योद्धा होते. त्यांनी दिल्लीच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डौलाने फडकवला. त्या महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला हे माझं भाग्य आहे. पण हे सर्व विरोधक आहेत त्यांचं पोटशूळ उठलेलं आहे. ते द्वेषाने पछाडलेले आहेत. त्या द्वेषात ते काय बोलतात हेही त्यांना कळत नाही. त्यांनी महादजी शिंदे यांचा अपमान केलाय. एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय. त्याचबरोबर साहित्यिकांना दलाल म्हटलं आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

    ‘…म्हणून तर मी या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो’

    “दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्या साहित्यिकांचादेखील विरोधकांनी अपमान केला आहे. त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही अपमान केला आहे. राजकारणापलिकडे जावून काही नाती जपायची असतात, संबंध जोडायचे असतात हे शरद पवारांनी दाखवून दिलं आणि मी देखील माझ्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत काय तर माझ्या 10 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत आणि 40 वर्षाच्या सामाजिक कारकीर्दीत स्वत:ला राजकारणाच्या कक्षेत बांधून घेतलं नाही. मी राजकारणाच्या पलिकडे मैत्रीही जपली आणि संबंधदेखील जपले. म्हणून तर मी या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    “आज जे आरोप करत आहेत, दोष देत आहेत, लोकांचा अपमान करत आहेत, या सर्व लोकांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल. विधानसभेत तर त्यांना चारीमुंड्या चीत केलं. त्यांनी विरोधी पक्षनेत्या इतकी संख्याही मिळाली नाही. तरीही ते सुधारत नाहीत. आता ते असेच बोलत राहिले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा सुफडा साफ होईल. ते चारीमुंड्या चीत होतील”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *