• Sun. Mar 8th, 2026

    Sanjay Raut : ‘पवारसाहेब, राजकारण आम्हालाही कळतं, पण…’; शिंदेंच्या सत्कारामुळे शरद पवारांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

    Sanjay Raut : ‘पवारसाहेब, राजकारण आम्हालाही कळतं, पण…’; शिंदेंच्या सत्कारामुळे शरद पवारांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

    Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारं आहे. पवारांच्या गुगलविषयी अपप्रचार आहे. कोण हिट विकेट होतायेत हे समजून घ्यावं लागेल, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नव्हतं पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : राजधानी दिल्ली येथे ९८ व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. शरद पवारांनी त्यांच्या कार्यक्रमाला जायला नव्हतं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    पवारांच्या गुगलीविषयी अपप्रचार आहे. कोण हिट विकेट होतायेत हे समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नव्हतं पाहिजे. ही आमची भावना आहे, महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार आहोत, असा सवालही संजय राऊतांनी केला आहे.

    राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो ठिक आहे. ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत खुलेआम बसलेले आहेत. त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का देणारं आहे. ही आमची भावना आहे, कदाचित शरद पवारांची भावना काही वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारचं राजकारण पटलेले नाही. आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहांच्या मदतीने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता याच्यामुळे मराठी माणसाच्या मनाला वेदना झाल्या. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण जे काही आहे ते माहित नाही पण राजकारण आम्हालाही कळतं. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तगू होत असेल हा तुमचा व्यक्तिगत आणि कौटुंबिक प्रश्न असेल. तरीही आम्ही भान राखून पाऊल टाकत असतो, असं संजय राऊत म्हणाले.

    शरद पवार यांना चुकीची माहिती आहे, ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम शिवसेनेने केलं. सतीश प्रधान यांच्या काळात ठाण्याचा विकास झाला. ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदान, गडकरी रंगतदायन, पहिलं नाट्यगृह या सगळ्या बाळासाहेबांच्या संकल्पना होत्या. सतीष प्रधान हे महापौर, नगराध्यक्ष होते, त्यांना विकासाची दृष्टी होती, टेंडरबाजी केली नाही. पवार साहेबांना माहिती हवी असेल तर आमचे कार्यकर्ते त्यांना जाऊन देतील. एकनाथ शिंदे उशिरा आमदार झाले. त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरूवात झाली. बिल्डरांच्या घशात गेल्याचं म्हणत राऊतांनी निशाणा साधला.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed