• Wed. Jun 17th, 2026
    पोटचा गोळा गमावला तरी दुःख संपेना, अत्यवस्थ महिलेला झोळीतून १५ किलोमीटर नेलं; सरकारी अनास्थेमुळे मरणयातना

    Nandurbar Shocking News : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपता संपत नसल्याचे चित्र आहे. येथील एका गावात आदिवासी महिलेच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रसुतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपता संपत नसल्याचे चित्र आहे. येथील एका गावात आदिवासी महिलेच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गावाला रस्ता नसल्याने महिलेची घरीच प्रसुती करण्याची वेळ आली. मात्र प्रसुतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.

    राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ जवळील केलापाणी पाटीलपाडा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. येथील आदिवासी महिलेला प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्याने रुग्णालय गाठण्यासाठी बांबू झोळीतून जंगल मार्गाने न्यावे लागले. तब्बल पाच तास १५ किलोमीटर जीवघेणा प्रवास करावा लागला. नंदुरबार जिल्ह्यात सन २०१७ ते २०२४ या आठ वर्षाच्या कालावधीत तब्बल पाच हजार ८८८ बालमृत्यू झाल्याची नोंद आहे.

    धडगाव तालुक्यातील केलापाणी गावातील पाटीलपाडा हे ५३० लोकसंख्या असलेला पाडा. येथील लीला वसावे या गर्भवती महिलेला 3 फेब्रुवारी रात्री बाराच्या सुमारास प्रसुती वेदना सुरु झाल्या. मात्र रात्री रुग्णालय गाठणे शक्य नव्हते यामुळे त्रास वाढत असताना गावातील महिलांना बोलून घरीच प्रसुती करण्यात आली. मात्र दुर्दैवाने प्रसुतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी या मातेला त्रास होत असताना रुग्णालय पर्यंत पोहोचवणं गरजेचे होते मात्र रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहचणे शक्य झाले नाही. त्यामुळे गावातील आदिवासी बांधवांनी बांबू पासून झोळी करत जंगल मार्गाने या महिलेला पोहचवण्याचे ठरवले आणि तब्बल १५ किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करत अखेर केलापाणी पाटीलपाडा ते कालापाणी पर्यंत पोहोचण्यासाठी ५ तासांचा वेळ गेला. मुख्य रस्त्यावर पोहचल्यानंतर अखेर रुग्णवाहिका बोलवून या आदिवासी महिलेला तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती आता चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    देश स्वातंत्र होऊन ७७ वर्ष पूर्ण झाले तरी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची मरण यातना थांबायचे नाव घेत नाही. अद्यापही अनेक गावे पक्क्या रस्त्यांपासून वंचित आहेत. तसेच अनेक गावांत वीज नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही, वीज नाही, पाणी नाही. एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो निधी खर्च करीत असल्याचे कागदोपत्रीच दाखवते. परंतु प्रत्यक्षात मात्र हा करोडोंचा निधी या योजना जातात तरी कुठे? हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. दरम्यान, २५ जानेवारी २०२४ मध्ये केलापाणी ते कालापाणी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र वर्ष उलटूनही कामाला सुरुवात झालेली नाही. याच रस्त्यामुळे एका नवजात बालकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे.

    पाच वर्षात साडेपाच हजारांवर बालकांचा मृत्यू

    नंदुरबार जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण राज्यात सर्वाधिक दिसून येते. सन २०१७ ते २०२४ या आठ वर्षाच्या कालावधीत विविध कारणांनी नंदुरबार जिल्ह्यात तब्बल ५ हजार ८८८ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४४२ बालकांचा मृत्यू झाला. ० ते ६ वर्ष वयोगटातील बालमृत्यू चिंतेचा विषय ठरत आहे. आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या नंदुरबारसाठी कोटींच्या योजना राबवल्या जात असताना बालमृत्यूच थांबत नसल्याने योजनांच्या अमंलबजावणीवर व यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed