• Fri. Mar 13th, 2026
    सोयाबीन खरेदीला अखेर थांबा, शेतकरी हतबल; पाशा पटेल म्हणतात, ‘खरेदी केलेले सोयाबीन ठेवायचे कुठे?’

    Latur News : सोयाबीन खरेदी बंद झाल्याने आता जिल्ह्यात अंदाजे २ लाख क्विंटल सोयाबीन अद्यापही खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. मुदतवाढ मिळेल काय? हा प्रश्न असताना राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, राज्याच्या उद्देश हा १४ लाख मेट्रिक टन आहे. तर सरकार समोर अपुऱ्या जागेमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केलेले ठेवायचे कुठे?

    Lipi

    ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यातील हमीभावाने खरेदी होणारे सर्व ५२ सोयाबीन खरेदी केंद्रावरील सोयाबीन खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंदाजे २ लाख क्विंटल सोयाबीन अद्यापही खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. अजूनही जवळपास ८ हजार शेतकऱ्यांना खरेदीच्या मेसेजची प्रतीक्षा आहे. ६ फेब्रुवारीला खरेदी केंद्र बंद पडल्यानंतर अनेक शेतकरी जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर रांगेत वाहनं लावून उभे आहेत. माय-बाप सरकार खरेदी केंद्राची मुदत वाढवून देईल अशी अजूनही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र सरकारने अद्याप सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेतलेली नाही. मुदतवाढ मिळेल काय? यावर बोलताना राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, राज्याच्या उद्देश हा १४ लाख मेट्रिक टन आहे. तर सरकार समोर अपुऱ्या जागेमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केलेले ठेवायचे कुठे? असा प्रश्न आहे.

    पाशा पटेले म्हणाले, आतापर्यंत सरकारकडून राज्यभरात ११ लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. आता शेतकऱ्याकडून खरेदी केलेले सोयाबीन कुठे ठेवायचे हा प्रश्न सरकार समोर उभा ठाकला आहे. यामुळे आता मुदतवाढ मिळेल असे मला वाटत नाही. देशामध्ये १० राज्य सोयाबीनचे उत्पादन घेतात. मात्र महाराष्ट्रात सरकारकडून ११ लाख लाख मेट्रीक टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. राज्याचा उद्देश हा १४ लाख मेट्रिक टन असून आता सरकार समोर अपुऱ्या जागेमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केलेले ठेवायचे कुठे? हा प्रश्न आहे.

    काय आहे शेतकऱ्यांची मागणी?

    लातूर जिल्हा हा सोयाबीनचा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकूण क्षेत्रापैकी ६५ ते ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा केला जातो. यामुळे लातूर जिल्ह्यात एकूण नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी जवळपास आठ हजार शेतकरी हे अजून सोयाबीन खरेदी पासून वंचित आहेत. केंद्र सरकारने यापूर्वी ३१ जानेवारी ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली होती. यानंतर ६ फेब्रुवारी ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झालेले नाही. आता शेतकऱ्यांमधून फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत ही परिस्थिती असल्यामुळे केंद्र सरकारने विचार करून हा निर्णय घ्यावा, अशी शेतकरी भूमिका मांडत आहेत.

    शेतकऱ्यांना आता बाजारभावात सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय नाही.
    केंद्र सरकारकडून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र उभे करण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत आता हमीभाव खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. बाजारामध्ये सोयाबीनच हमीभाव खरेदी केंद्रापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी यावेळी हमीभाव केंद्रावर गर्दी केलेली पाहायला मिळाली.

    शेतकरी आता अवघ्या ४ हजार ते ४१०० इतक्या भावाने सोयाबीन विक्री करण्यासाठी मजबूर झाले आहेत. शासनाने निश्चित केलेल्या ४ हजार ८९२ रुपये इतका भाव मिळेल, या आशेने गेल्या ४ ते ५ दिवसांपासून अनेक शेतकरी रांगेत उभे आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed