“आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही. मला घडवलं, पाठिशी तुम्ही उभं राहिलात, पण आता मी तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं असतानाच सोडून जातोय. कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो. मी ही थांबतोय”, असं हभप शिरीष महाराज मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत.
शिरीष मोरे आई-वडिलांना लिहिलेल्या चिठ्ठीत काय म्हणाले?
“प्रिय मम्मी-पप्पा आणि दिदी, आयुष्यात जे-जे करायचं म्हटलं त्या पाठिशी तुम्ही उभे राहिलात. जे मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात, ते तुमच्या पाठिंब्याने काही वर्षातच मिळालं. आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही. मला घडवलं, पाठिशी तुम्ही उभं राहिलात, पण आता मी तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं असतानाच सोडून जातोय. कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो. मी ही थांबतोय. यात सर्वस्वी दोष माझाच आहे. मला माफ करा”, असं शिरीष मोरे आपल्या मृत्यूपूर्वी आई-वडिलांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत.
मित्रांना पाठवलेल्या पत्रात काय म्हणाले?
“प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय… खरंतर युद्धातून पळ काढणाऱ्याने मदत मागणे चूकच. पण कृपा करुन आई-वडिलांना सांभाळा. दिदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. डोक्यावर खूप कर्ज झालंय. त्याची सारी यादी देतोय. गाडी विकूनही काही कर्ज राहील. त्यात तुम्ही सर्वांनी मदत करुन आई-वडिलांना जपा. मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल, पण आता ताकद नाही लढण्याची. माफ करा”, असं शिरीष मोरे शेवटच्या पत्रात म्हणाले आहेत.
“आणि आमची नवरीबाई… तिचं आयुष्य उद्ध्वस्त करुन चाललोय. खूप आहे प्रियंका. तिला वेळ देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो”, असं शिरीष महाराज मोरे पत्रात म्हणाले आहेत.

