• Mon. Mar 16th, 2026

    ‘कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो, मी ही थांबतोय’; तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंची शेवटची चिठ्ठी समोर

    ‘कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो, मी ही थांबतोय’; तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंची शेवटची चिठ्ठी समोर

    “आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही. मला घडवलं, पाठिशी तुम्ही उभं राहिलात, पण आता मी तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं असतानाच सोडून जातोय. कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो. मी ही थांबतोय”, असं हभप शिरीष महाराज मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं आहे. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे देहू गावात शोककळा पसरली आहे. संबंधित वृत्त समोर आल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या वंशजांवर अशी वेळ का आली असावी? अशी चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. हभप शिरीष महाराज मोरे यांनी मृत्यूपूर्वी पाच चिठ्ठ्या लिहिल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी त्यांनी आई-वडील, बहीण आणि मित्रांना लिहिलेल्या चिठ्ठीतला मजकूर समोर आला आहे. त्यांच्या चिठ्ठीत मनाला चटका लावणारा मजकूर आहे. शिरीष महाराजांनी कर्जामुळे स्वत:ला संपवल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. पण या प्रकरणी देहू रोड पोलीस तपास करत आहेत.

    शिरीष मोरे आई-वडिलांना लिहिलेल्या चिठ्ठीत काय म्हणाले?

    “प्रिय मम्मी-पप्पा आणि दिदी, आयुष्यात जे-जे करायचं म्हटलं त्या पाठिशी तुम्ही उभे राहिलात. जे मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात, ते तुमच्या पाठिंब्याने काही वर्षातच मिळालं. आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही. मला घडवलं, पाठिशी तुम्ही उभं राहिलात, पण आता मी तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं असतानाच सोडून जातोय. कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो. मी ही थांबतोय. यात सर्वस्वी दोष माझाच आहे. मला माफ करा”, असं शिरीष मोरे आपल्या मृत्यूपूर्वी आई-वडिलांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत.

    मित्रांना पाठवलेल्या पत्रात काय म्हणाले?

    “प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय… खरंतर युद्धातून पळ काढणाऱ्याने मदत मागणे चूकच. पण कृपा करुन आई-वडिलांना सांभाळा. दिदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. डोक्यावर खूप कर्ज झालंय. त्याची सारी यादी देतोय. गाडी विकूनही काही कर्ज राहील. त्यात तुम्ही सर्वांनी मदत करुन आई-वडिलांना जपा. मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल, पण आता ताकद नाही लढण्याची. माफ करा”, असं शिरीष मोरे शेवटच्या पत्रात म्हणाले आहेत.

    “आणि आमची नवरीबाई… तिचं आयुष्य उद्ध्वस्त करुन चाललोय. खूप आहे प्रियंका. तिला वेळ देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो”, असं शिरीष महाराज मोरे पत्रात म्हणाले आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed