• Wed. Jun 10th, 2026
    शिंदेंच्या ठाण्यात पुन्हा ठिणगी; भाजप, सेनेत वर्चस्वाची लढाई; संघर्षभूमी ठरणार पॉवरफुल समिती

    राज्यात प्रचंड बहुमतानं सत्तेत येऊनही महायुतीला सत्ता स्थापनेसाठी महिनाभराचा अवधी लागला. त्यानंतर पालकमंत्र्यांची यादीही उशिराच जाहीर झाली. त्यातही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: राज्यात प्रचंड बहुमतानं सत्तेत येऊनही महायुतीला सत्ता स्थापनेसाठी महिनाभराचा अवधी लागला. त्यानंतर पालकमंत्र्यांची यादीही उशिराच जाहीर झाली. त्यातही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. तो विषय अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यानंतर आता महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये नवा संघर्ष सुरु झाला आहे. जिल्हा नियोजन समित्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सरकारमधील तीन पक्षांमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यता दिसू लागली आहे.

    सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या शासनानं तत्काळ प्रभावानं रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा नियोजन समित्यांवरील वर्चस्वासाठी येत्या काळात कुरघोड्यांचं राजकारण पाहायला मिळालं. जिल्हा नियोजन समित्यांचं अध्यक्षपद पालकमंत्र्यांकडे असतं. त्यामुळे जिल्हा नियोजन आराखड्यातील निधीवर त्यांचं वर्चस्व असतं. त्यातच आता राज्यात अर्थसंकल्पाची तयारी सुरु झालेली आहे.
    आता गडकरींना मोठे हायवे प्रकल्प मंजुरीचा अधिकार नाही; दस्तुरखुद्द मंत्र्यांनीच कारण सांगितलं
    सध्याच्या घडीला प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आमदार, खासदारांच्या उपस्थितीत जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये लगबग सुरु आहे. पण शासनानं सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रिता सदस्यांच्या नियुक्त्या २८ जानेवारीला रद्द करत तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. यामुळे येत्या काळात जिल्हा नियोजन समितीत वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये शह-काटशहाचं राजकारण रंगताना दिसेल.

    पालिकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाण्यात जनता दरबारावरुन भाजप आणि शिवसेनेत वर्चस्वाची लढाई आधीच सुरु झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वादाला तोंड फुटलं आहे. ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा करत नाईक यांनी थेट शिंदे यांनाच आव्हान दिलं आहे. आता या वादाचे पडसाद जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य नियुक्त्यांवरही उमटणार आहेत.
    आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय तुरुंगातून सुटताच मातोश्रीवर; गळाभेटीनंतर दोघेही भावूक
    जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत पालकमंत्री शिंदेंवर भाजप आमदारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अखेर मंत्री आणि सेना आमदार प्रताप सरनाईक बैठकीत शेवटी येत शिंदेंच्या मदतीला धावले. त्यामुळे ठाणे जिल्हा नियोजन समितीत वर्चस्वावरुन आणखी ठिणग्या पडण्याची शक्यता आहे. ठाण्यात सेनेचे ६, तर भाजपचे ९ आमदार आहेत.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed