• Tue. Jun 9th, 2026

    वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार? अखेर जादूटोणाच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

    वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार? अखेर जादूटोणाच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

    खासदार संजय राऊत यांच्या जादूटोणाच्या आरोपांनंतर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर अद्याप राहायला का गेले नाहीत? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तसेच वर्षा या शासकीय बंगल्यावर कधी राहायला जाणार? याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊन आता दोन महिने होत आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 50 पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी लोटला असला तरी ते अजूनही त्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी निवासासाठी गेलेले नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी ‘वर्षा’ हे शासकीय निवासस्थान आहे. निवडून आलेला प्रत्येक मुख्यमंत्र्यांना प्रोटोकॉलनुसार वर्षा निवासस्थानी निवासासाठी जावं लागतं. कारण तिथे सर्व व्यवस्था आणि यंत्रणा आहे. पण दोन महिने होत आली तरी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी राहण्यासाठी न गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याच्या लॉनवर जादूटोणा करण्यात आला असल्याने फडणवीस तिथे अद्याप निवासासाठी गेले नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    आपण वर्षा बंगल्यावर अद्याप का निवासासाठी गेलो नाही आणि कधी राहायला जाणार? याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे. मुलीची दहावीची परीक्षा संपल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर बंगल्याचं काम करुन तिथे राहायला जाणार”, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यामुळे याबाबतच्या वादावर आता पडदा पडल्याची चर्चा आहे.

    देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    “एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मला तिथे राहायला जायचं आहे. त्यापूर्वी तिथे काही छोटी-मोठी कामे चालू होती. दरम्यानच्या काळात माझी मुलगी दहाव्या वर्गात आहे. येत्या 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरु होत आहे. त्यामुळे ती म्हणाली की, माझी झाल्यानंतर आपण तिथे शिफ्ट होऊ. त्यामुळे मी वर्षा बंगल्यावर अजून शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर तिथे शिफ्ट होईल. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा सुरु आहेत. मला तर वाटतं माझ्या स्तरावरच्या माणसाने तर या चर्चांवर उत्तरही देऊ नये”, अशी सविस्तर प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
    कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, धनंजय मुंडेंचा खुलासा, पण दमानियांनी GR वाचत…

    संजय राऊत यांचे आरोप काय?

    संजय राऊत यांनी याबाबत खळबळजनक दावे केले आहेत. कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याचे शिंग हे वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कापलं आहे, असा खळबळजनक दावा करत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोण्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गटात दोन ते तीन दिवसांपासून हे जादूटोणाचे परस्परांवर आरोप केले जात आहेत. अखेर या वाकयुद्धानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्याने आता या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed