Accident News : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शनिवारी झालेल्या तीन अपघातांमध्ये चारजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहाटेच्या अपघातामध्ये रत्नागिरीतील चालकासह तीनजण ठार झाले, तर दुसऱ्या अपघातात ४९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिसऱ्या अपघातामध्ये कोणतीही जखमी घटना नाही.
सकाळी सहाच्या सुमारात अपघाताची घटना
रत्नागिरी येथील सात जण हे कारने प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे ते समृद्धी महामार्गाने घरी परतत असताना वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मलढोण शिवारात सकाळी सहाच्या सुमारास चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पुढील वाहनावर जाऊन आदळली. या अपघातात रत्नागिरी माळनाका येथील येथील डीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई ( य ६९), अथर्व किरण निकम (२४) आणि चालक भाग्यवान झगडे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर निवृत्त सहाय्यक निबंधक किरण निकम (५८), रमाकांत पांचाळ (६०), रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज (५०) आणि प्रांजल प्रकाश साळवी (२४) जखमी झाले आहेत. यातील निकम यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
दुर्दैवी! शनीदेवाच्या दर्शनाला निघाले, पण काळाने वाट अडवली; अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यूदुसरा अपघात सोनांबे-सोनारीदरम्यान झाला. सोनगाव येथील अमोल भाऊसाहेब भाटे (३०) हे आई मंदा भाऊसाहेब भाटे (४९), पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी सोनल यांच्यासमवेत कारने वसई येथे सासुरवाडीला एका कार्यक्रमाला गेले होते. तेथून घरी परतत असताना चॅनल नंबर ५७०.७ येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पुढील ट्रकवर आदळली. या अपघातात मंदा भाटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत.
टेम्पोचा टायर फुटला
शनिवारी पहाटे ५.३०च्या सुमारास समृद्धी महामार्गावर मुंबईकडून पैठणकडे जाणाऱ्या टेम्पोचा पुढचा टायर फुटला. त्यामुळे टेम्पो लोखंडी बॅरियरवर जाऊन आदळला. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.

