• Fri. Mar 13th, 2026
    सेनेला ‘तो’ प्रस्ताव अमान्य; पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम; महायुतीत चाललंय काय?

    रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा २ आठवडे उलटले तरीही कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून परतले आहेत. ते दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यातून तोडगा काढणार आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा २ आठवडे उलटले तरीही कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून परतले आहेत. ते दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यातून तोडगा काढणार आहेत. शिवसेनेला या संदर्भात एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे. पण तो सेनेला अमान्य आहे. नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा विषय सेनेनं लावून धरला आहे.

    नाशिकचं पालकमंत्रिपद भारतीय जनता पक्षाच्या गिरीश महाजन यांच्याकडे, तर रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अदिती तटकरेंना देण्यात आलेलं आहे. शिवसेनेनं या दोन्ही नियुक्त्यांना जोरदार विरोध दर्शवला. मुंबई-गोवा महामार्गावर रायगडमध्ये शिवसैनिकांनी टायर जाळत त्यांना विरोध दर्शवला. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस वर्ल्ड एकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमासाठी दावोसला गेले होते. तिथून त्यांनी रायगड, नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली.
    शिंदेंना घेरण्यासाठी भाजपचं तगडं प्लानिंग; नडणाऱ्या दादांवर जबाबदारी, आमदार पडू लागले भारी
    रायगडचं पालकमंत्रिपद भरत गोगावले, तर नाशिकचं पालकमंत्रिपद दादा भुसेंना मिळावं यासाठी शिवसेना आग्रही आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी शिवसेनेला सहपालकमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. पण तो सेनेला मान्य नाही. शिवसेनेला पालकमंत्रिपदच हवं आहे. त्यामुळे तिढा कायम आहे. राज्यातील दोन जिल्ह्यांना पालकमंत्री आणि सहपालकमंत्री देण्यात आलेले आहेत. त्यात मुंबई उपनगर आणि कोल्हापूरचा समावेश आहे.

    येत्या दीड ते दोन वर्षांत नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जाणार आहे. त्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रिपद हवं आहे. ‘महायुतीत तीन पक्ष आहेत. तीनही पक्ष तोलामोलाचे आहेत. प्रत्येकाला पालकमंत्रिपद हवंहवंसं वाटणं स्वाभाविक आहे. येत्या दीड-दोन वर्षांत नाशकात कुंभमेळा होणार आहे. मी कुंभमेळा मंत्री आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदही माझ्याकडेच राहिल्यास समन्वयाच्या दृष्टीनं ते सोयीस्कर ठरेल,’ असं महाजन म्हणाले. तर याबद्दल वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय होईल. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील, अशी भूमिका शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसेंनी मांडली.
    हा तर माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार; ‘त्या’ ऑफरवर छगन भुजबळ रोखठोक बोलले
    पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवला. पदापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची आहे. आम्ही राज्याला प्रगतीपथावर पुढे घेऊन जात आहोत. पदांपेक्षा जनतेशी असलेली नाळ महत्त्वाची आहे. मला काय मिळालं, त्यापेक्षा जनतेला काय मिळालं ते अधिक महत्त्वाचं आहे, असं शिंदे म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *