Prakash Desai : शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर महाड येथे मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला व मंत्री आदिती तटकरे व खा. सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दोन तास महामार्ग रोखून धरला होता. महाड उपविभागीय हद्दीत असणाऱ्या पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिवसैनिकांना बाजूला केले आणि मार्ग मोकळा झाला. जाळपोळ करण्यात आलेल्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे
विधानसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाचे कर्जत विधान सभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर चिखलफेक करण्यास सुरू केली, ती आजपर्यंत थांबलेली नाही. यातच रायगड जिल्हा पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची कन्या तथा महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, यांची नियुक्ती झाल्यानंतर शिंदे गटाच्या समर्थकांनी जिल्ह्यात गदारोळ करण्यास सुरवात केली आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांनी त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देऊन जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासूनरायगड जिल्हा पालकमंत्री म्हणून, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती होईल, अशी आशा असतानाच पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्याकडे पुनश्च जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे, जिल्ह्यात पालकमंत्री पदाचे दावेदार असणाऱ्या भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्यासहित शिवसेनेसह भाजपा मधील अनेकांना आश्चर्य धक्का बसला आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर महाड येथे मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला व मंत्री आदिती तटकरे व खा. सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन तसेच भाजपचे देखील तीन आमदार असून राष्ट्रवादीच्या एकमेव आदिती तटकरे आमदार असताना पुन्हा त्यांनाच पालकमंत्री नेमल्याने खा. सुनील तटकरे हेच रायगड राजकारणात श्रेष्ठ असल्याचे सिद्ध झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील शिवसेनेचे जिल्ह्यात संख्याबळ जास्त असताना आदितीला पालकमंत्री नेमल्याने सेनेच्या आ. महेंद्र दळवी, आ. भरत गोगावले आणि आ. महेंद्र थोरवे यांनी उघड नाराजी दर्शविली होती. सेनेचे भरत गोगावले यांना अखेर पर्यंत मंत्रीपद दिले गेले नाही आणि यावेळी देखील दिलेल्या मंत्रीपदावर ते खुश नसल्याचे सांगण्यात येते.

