• Fri. Jul 24th, 2026
    Mumbai Protest : उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, भर पावसात शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांचा महापूर, नव्या पिढीचे ठाकरे बंधू रस्त्यावर

    “आम्ही सर्व भारतीय आहोत. पहिल्यांदा जेन-झी आणि जेन-अल्फा यांच्या हिंमतीला पूर्ण पाहिलं आहे. तुम्ही घाबरत नाहीत. आम्हाला आधी वाटायचं की, तुम्ही आम्हाला नवीन भाषा शिकवत आहात. पण तुम्ही आम्हाला हिंमत शिकवली. तुम्हाला सलाम करतो”, असं आदित्य ठाकरे शिवाजी पार्कच्या मैदानावर भर मंचावर म्हणाले. शिवाजी पार्कात आज राष्ट्रगीत गायनासाठी सर्व आंदोलक एकत्र आले होते. यानंतर आता 26 जुलैला ठाकरे बंधूंचा शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिर चौकपर्यंत मोर्चा निघणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात एकत्र येत आंदोलन केलं. या आंदोलनात अभिनेता अतुल कुलकर्णी सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे हे देखील या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आंदोलनस्थळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील दाखल झाले. त्यामुळे या आंदोलनाला जास्त महत्त्व प्राप्त झालं. उद्धव ठाकरे मंचावर दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना 26 मार्चच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलं. यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत म्हटलं आणि उद्धव ठाकरे आंदोलनस्थळावरुन निघून गेले.

    आदित्य ठाकरे काय म्हणाले?

    “मी सर्वांना वचन दिलं होतं की, हे संपूर्ण देशाचं आंदोलन असणार आहे. इथे सर्वांच्या हातात तिरंगा आहे. आपण सर्व अभिजीत दिपके, सोनम वांगचुक आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्र आलो आहोत. इथे राजकीय भाषणं होणार नाहीत, असं मी वचन दिलं होतं. आम्ही इथे एकाच कारणाने इथे उभे आहोत. आपण इथे आंदोलनाला आले आहात. आपल्याला कुणीही हात लावू नये यासाठी आम्ही दोघेजण इथे उभे आहोत. हा देश आमचा आहे आणि आमचाच असणार आहे. कुणीही लाठी चालवणार नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

    ‘आवाज दिल्लीपर्यत जायला हवा’

    “आपण सर्वांनी सोनम वांगचुक यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी 25 दिवस उपोषण केलं. उपोषण संपलं आहे. पण आंदोलन संपलेलं नाही. अभिजीत दिपके आणि अनेक तरुण आजही दिल्लीत जंतरमंतर मैदानावर बसले आहेत. आपला आवाज तिकडे दिल्लीपर्यंत पोहोचायला हवा”, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

    aaditya thackeray

    तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? आदित्य ठाकरेंचा सवाल

    “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. तोपर्यंत शांत बसायचं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे किती लोकांनी काल रात्री इन्स्टाग्रावर पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ पाहिला? लाठी खालल्यानंतर आपण त्यांचे मित्र बनू शकता का? अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? पेपर लीक झाल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का?”, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले.

    “संविधानाचा अपमान करणाऱ्यांचे तुम्ही मित्र बनू शकता का? ते जेव्हा घाबरतात तेव्हा हिंदू-मुस्लीम करतात, त्यांचे मित्र तुम्ही बनू शकता का? जेव्हा ते घाबरतात तेव्हा जातीधर्माची, भाषेची बात करतात, आपण त्यांचे मित्र बनू शकतात का? जे आपत्तीच्या वेळी आपल्यात नाही तर परदेशात जातात, त्यांचे मित्र तुम्ही बनू शकतात का? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देईपर्यंत तुम्ही शांत बसू शकतात का?”, असे देखील सवाल आदित्य ठाकरे यांनी केले.

    ‘ही शिवरायांची भूमी’

    “इथे मी आहे, अमित ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत, पण आमच्या सर्वांपेक्षा मोठा आवाज तुम्ही आहात. हा मंच आमचा नाही, हे आंदोलन आमचं नाही. कदाचित तुमच्यातील अनेक जण आम्हाला मतदान करत नसतील आणि त्यात काही चुकीचं नाही. तो तुमचा अधिकार आहे. मी नेहमीच आपल्या अधिकारांचा आदर करतो. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमी आहे. प्रेमाने बोलणार असाल तर प्रेम मिळेल आणि घाबरवण्यासाठी याल तर वेदना मिळतील”, असं आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

    राष्ट्रगीत गायनानंतर हे आंदोलन संपलं आहे. सर्व नेतेमंडळींकडून आंदोलकांना सावकाश घरी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण आंदोलक अजून मैदान सोडायला तयार झालेले नाहीत.