• Mon. Jun 15th, 2026

    सरकारी अधिकाऱ्यांनो, ‘पगारात भागवा’! राजपत्रित अधिकारी महासंघाचे विशेष अभियान, दशसूत्री केली जाहीर

    सरकारी अधिकाऱ्यांनो, ‘पगारात भागवा’! राजपत्रित अधिकारी महासंघाचे विशेष अभियान, दशसूत्री केली जाहीर

    Govt Employees: आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारात भरगच्च वाढ होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे पगारवाढ होणार असली तरी राज्यातील सामान्य नागरिकांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची असलेली नकारात्मक प्रतिमा अद्याप कायम आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    mantralaya2

    मुंबई : केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. या आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारात भरगच्च वाढ होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे पगारवाढ होणार असली तरी राज्यातील सामान्य नागरिकांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची असलेली नकारात्मक प्रतिमा अद्याप कायम आहे. जनसामन्यांमधील ही नकारात्मक प्रतिमा सुधारण्यासाठी आता राज्यातील महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने नव्या अभियानाची हाक दिली आहे. अधिकारी महासंघाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी `पगारात भागवा’ या अभियानाची घोषणा केली असून सरकारी कर्मचाऱ्यांना दशसूत्रींची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातील प्रशासकीय कामांत पारदर्शकता आणणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दी. कुलथे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.

    राज्यातील जवळपास सर्वच सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पगार, भत्ते, निवृत्ती वेतन आणि इतर रास्त मागण्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्याचवेळी या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत जनमानसात नकारात्मक भावना दिसून येते. त्यामुळे राज्य महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे नववर्षाच्या प्रारंभाला ‘पगारात भागवा’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानानुसार अधिकारी महासंघातर्फे दशसूत्रीच्या अंमलबजावणी एक पत्रक राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात या दशसूत्रीची एक प्रत फलक स्वरुपात लावण्यात येणार असल्याची माहितीही पुढे आली आहे. अधिकाऱ्यांकडून पगाराव्यतिरिक्त अपेक्षा ठेवल्यामुळेच ही प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळेच ‘पगारात भागवा’ या अभियानाचा प्रयोग आता महासंघातर्फे राबविण्यात येत आहे.
    Sanjay Raut: आगामी सामना आम्हीच जिंकणार; संजय राऊत यांची ठाण्यात राजकीय ‘फटाकेबाजी’
    या दशसूत्रीनुसार संपूर्ण कार्यसंस्कृतीचा मुख्य आधार हा शंभर टक्के प्रामाणिकपणा असणार आहे. त्याशिवाय खरी निष्ठाच नागरिकांना उत्तम आणि उत्कृष्ट सेवा प्रदान करता येणार आहे. तर अधिकाऱ्यांनी आपापल्या समोर येणारे आव्हान, अडथळे, मोह, अपेक्षा आदी सकंटांना सहजतेने बाजूला सारावे, असे आवाहन अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. ‘नकारात्मक विचार आणि अप्रामाणिकपणा बाजूला सारल्यास महाराष्ट्र देशाचा मुकूटमणी होण्याची प्रक्रिया गतिमान होईल’, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तर, ‘या गतिमानतेचा आधार ही आपली वैचारिक, मानसिक, बौद्धिक परंपरा महामानवांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा गौरव कैकपटीने वाढविण्याचा असेल’, असे या दशसूत्रीत नमूद करण्यात आल्याची माहिती कुलथे यांनीदिली.
    प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात ‘सैराट’ची पुनरावृत्ती, २६ वर्षीय तरुणाला निर्घृणपणे संपवलं
    अधिकाऱ्यांबद्दल नागरिकांमध्ये असलेली प्रतिमा ही आपण सगळेच जाणता. यात बदल करण्यासाठी महासंघाने हे पाऊल उचलले आहे. राज्यातील शासकीय कार्यालये, पोलिस ठाणे, न्यायालये आणि रुग्णालयांमध्ये येणारी व्यक्ती ही गरजू आणि त्रस्त असते. त्यांना मदत करण्यासाठी वर्तन आणि वाणीमध्ये, वात्सल्य आणि करुणा असावी. शासन, प्रशासनामध्ये असलेला दुरावा संपुष्टात आणण्यात हे अभियान फायदेशीर ठरेल. – ग. दी. कुलथे, मुख्य सल्लागार, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed