• Sun. Mar 8th, 2026

    पत्नीला घेऊन पाकिस्तानलाच जातो! बडतर्फ जवानाचं मंत्रालयाबाहेर आंदोलन; नेमकी व्यथा काय?

    पत्नीला घेऊन पाकिस्तानलाच जातो! बडतर्फ जवानाचं मंत्रालयाबाहेर आंदोलन; नेमकी व्यथा काय?

    पाकिस्तानात गेलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण यांनी आज मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. लष्करी गणवेशात आलेल्या चव्हाण यांच्या गळ्यात मागण्यांची पाटी होती.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेले जवान चंदू चव्हाण यांनी आज कुटुंबासोबत मंत्रालयासमोर आंदोलन केलं. आम्ही देशसेवा करायला लष्करात जातो. दहशतवादी व्हायला जात नाही. अधिकारी शिस्तीच्या नावाखाली जवानांचं निलंबन करतात. आता माझ्या कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी व्यथा मांडली.

    पाकिस्तानात गेलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण यांनी आज मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. लष्करी गणवेशात आलेल्या चव्हाण यांच्या गळ्यात मागण्यांची पाटी होती. गेल्या अकरा वर्षांपासून मी लढा देत आहे. मात्र, मला केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने अद्यापही शासकीय नोकरीत सामावून घेतलेलं नाही किंवा मला कोणत्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आल्याची आपबिती चंदू चव्हाण यांनी मांडली.
    Walmik Karad: कराड २२ दिवस कुठे होता? चौकशीतून महत्त्वाचा उलगडा; ठाकरेंच्या शिलेदाराचा दावा १००% खरा ठरला
    ‘गेल्या ४ महिन्यांपासून मी भीक मागतोय. आम्ही सैन्यात देशसेवा करायला जातो, दहशतवादी व्हायला जात नाही. आतापर्यंत १५ लाख जवानांना सैन्यातून काढलंय. अधिकारी शिस्तीच्या नावाखाली घरी पाठवतात. जवानांना दिलेल्या शिक्षेची व्हिडीओग्राफी व्हायला हवी. त्यामुळे चुकीची शिक्षा दिली जाणार नाही. माझ्या ओळखीचे अनेक जवान आहेत. त्यांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जवानांना ५ वर्षांत, ७ वर्षांत काढून टाकतात. यांचा मोठा घोटाळा मी बाहेर काढतोय,’ अशा शब्दांत चव्हाण यांनी व्यथा मांडली.

    ‘मी ११ वर्षे सेवा दिली. त्यानंतर मला घरी पाठवून दिलं. पाच शिक्षा झाल्या, आता तुम्ही घरी जा, असं मला सांगण्यात आलं. मी त्यांना सांगतोय, मला चुकीच्या पद्धतीनं शिक्षा देण्यात आलेल्या आहेत. सूड भावनेतून दिलेल्या आहेत. मला १९५० च्या कायद्यानुसार शिक्षा दिल्या. यामधून मानवाधिकाराचं उल्लंघन झालं आहे. पण माझं म्हणणं ऐकलंच जात नाही. त्यांना मला नोकरीवरुन काढून टाकलं. आता मला भारतात कुठेही नोकरीचा अधिकार नाही. खासगी कंपनीत गेलो तरीही तिकडे पडताळणी होईल. लष्करातून काढलं असल्यानं खासगी कंपनीतही मला नोकरी मिळणार नाही. आता माझ्यावर १२ लाखांचं कर्ज आहे. मला २ वर्षांचं लेकरु आहे. मी काय करायचं?,’ असा सवाल त्यांनी विचारला.
    Walmik Karad: पोलीस कोठडीत पहिल्याच रात्री कराडची प्रकृती बिघडली; श्वास घेताना त्रास, ऑक्सिजन लावला
    ‘मी पाकिस्तानात गेलो होतो, म्हणून मला शिक्षा दिली होती. शत्रूराष्ट्रात घुसलास आणि दोन लोकांना मारलं असा ठपका ठेवला गेला. मग भारत सरकारनं सर्जिकल स्ट्राईक कसा झाला ते सांगावं. मला युद्धबंदी केलं. जर मी युद्धकैदी होतो, तर मग शिक्षा का दिली? हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन वर्धमान यांनी छातीवर मेडल लावलं आणि आम्ही कटोरा घेऊन भीक मागतोय. कारण आम्ही पाकिस्तानात गेलो आणि पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला नोकरीची ऑफर दिली जात आहे. मी आता पत्नीला घेऊन पाकिस्तानात नोकरीला जातो,’ असं म्हणत त्यांनी उद्विग्नता व्यक्त केली.

    चंदू चव्हाण नेमके कोण?

    चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे रहिवासी आहेत. भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेल्या चव्हाण यांना पाकिस्तानी सैन्यानं पकडलं होतं. ते पाकिस्तानच्या ताब्यात ३ महिने २१ दिवस होते. यावेळी त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागलं. सरकारनं बरेच प्रयत्न करून त्यांना भारतात आणलं. ते भारतात परतल्यानंतर देशवासीयांनी मोठा जल्लोष केला होता.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed