• Fri. Mar 20th, 2026
    विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका, जळगाव जिल्ह्यात गारपीट; शेतकरी हवालदिल

    North Maharashtra Unseasonal Rain: उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी दिली. जळगाव शहरात अवघ्या २० मिनिटांत १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

    हायलाइट्स:

    • विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका
    • जळगाव जिल्ह्यात गारपीट; शेतकरी हवालदिल
    • विदर्भात वादळी पाऊस
    महाराष्ट्र टाइम्स
    उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका, जळगाव जिल्ह्यात गारपीट

    म.टा.प्रतिनिधी, नाशिक/नागपूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिह्यातील यावल तालुक्यात गारपीटही झाली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी दिली. जळगाव शहरात अवघ्या २० मिनिटांत १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावल तालुक्यातील बामणोद गावासह परिसरात जोरदार वाऱ्यांसह पाऊस व गारपीट झाली. या गारपिटीमुळे पंचक्रोशीतील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आठ ते १० किलोमीटर वेगाने वारेदेखील वाहत होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जळगाव शहरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे जळगावकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
    Pune News : भंगारातील फ्रीज तोडताना क्रॉम्प्रेसर गॅसचा स्फोट, पुण्यात हाहाःकार, एकाचा मृत्यू, परिसरात घबराट

    विदर्भात वादळी पाऊस

    विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना वादळी पावसाने झोपडून काढले. नागपुरात सायंकाळी सहानंतर अनेक ठिकाणी वादळी पावसाची हजेरी लागली. तसेच अकोला, अमरावती, बुलढाणा व वर्धा येथे तर जोरदार पाऊस झाला. नागपूरसह वाशिम, यवतमाळ व गोंदिया येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. आज, शनिवारीसुद्धा विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. वातावरणातील या बदलांमुळे थंडीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे.

    शेतकऱ्यांमध्ये चिंता

    अनेकभागात शुक्रवारी सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठांतील विक्रेते, व्यावसायिक, खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. तर, पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये विशेषत: द्राक्षे व कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed