• Sat. Mar 14th, 2026
    ‘काँग्रेस सरकार असताना सोलापुरला…’ प्रणिती शिंदेंनी शोकांतिका सांगत महायुतीवर साधला निशाणा

    Edited byविमल पाटील | Authored by इरफान शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Dec 2024, 8:39 pm

    Praniti Shinde: सोलापूरला मंत्रिपद मिळाले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. काँग्रेसचे सरकार असताना सोलापूरला मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री दोन्ही दिले होते, असे म्हणत प्रणिती शिंदेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. सोलापूरला मंत्रिपद मिळाले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. काँग्रेसचे सरकार असताना सोलापूरला मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री दोन्ही दिले होते. भाजपचे इथलं नेतृत्व सक्षमपणे काम करत नाही. म्हणूनच कदाचित सोलापूरला मंत्रिपद मिळालं नसावं, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदेंनी टीका केली. त्यांनी एकप्रकारे राज्याच्या मंत्रिमंडळात सोलापूरला स्थान मिळाल्याबद्दल भाजपच्या स्थानिक नेत्यांवर खापर फोडले आहे. तर ‘भाजपच्या नेतृत्वात दम नाही, घाबरू नका, मी काँग्रेसची खासदार आहे तुमच्यासोबत, असेही शिंदे म्हणाल्या.

    ‘दोन्ही वेळा भाजपने सोलापूरला वंचित ठेवलं’

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी सोलापूरच्या मंत्रिपदाबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘सोलापूरला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. पण, लक्षात ठेवा मी सोलापूरची खासदार आहे. जिल्ह्यातील तब्बल अकरापैकी पाच आमदार हे भाजपचे निवडून आले आहेत. मागील वेळी भाजप व भाजप समर्थक असे सहा आमदार जिल्ह्यातून निवडून आले होते. दोन्ही वेळी भाजपने सोलापूरला मंत्रिपदापासून वंचित ठेवले होते.’

    लाडकी बहीण सावत्र झाली का?

    निवडणुकीच्या अगोदर राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेंतर्गत अडवांस पैसे मिळाले होते. डिसेंबर महिन्यात अजूनही लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत, त्यावर बोलताना खा.प्रणिती शिंदें यांनी टीका केली. लाडकी बहीण आता सावत्र झाली आहे का? लाडकी बहीण हा चुनावी जुमला होता, हेच आता समोर आलं आहे, अशी टीका पुन्हा एकदा प्रणिती शिंदेंनी केली. त्या म्हणाल्या, ईव्हीएमची लढाई ही भाजप विरुद्ध काँग्रेस राहिलेली नाही. लोकांची लढाई झालेली आहे. मुख्यमंत्री हे ईव्हीएमचे मुख्यमंत्री आहेत. टेंडरसाठी मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केले.

    मारकडवाडीला राहुल गांधी जरूर येणार

    माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गाव देशपातळीवर आले आहे. राहुल गांधी हे मारकडवाडीला येणार आहेत. खासदार राहुल गांधी यांच्या दौऱ्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. मात्र, ईव्हीएमच्या विरोधात पाऊल उचलणाऱ्या मारकडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी निश्चितपणे मारकडवाडीला येणार आहेत, असेही खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed